-------------------------------------------------------------
अमळनेर - सर्वत्र पावसाची चाहूल लागून कोकिळा पावसाला साद घालत आहे. तर चातक पक्षी पावसाच्या थेंबातून तहान भागविण्यास आसुसलेला आहे. नांगरणी वखरणी आटोपून शेतकरी मान्सून सरिंची वाट बघत. तर पावशा पक्षी पेरते व्हा पेरते व्हा असे शेतकरी बांधवाना इशारा देत आहे. सर्वत्र आल्हाददायक वातावरणाची निर्मित होत असतांना येणाऱ्या पावसासोबत येत असलेल्या वादळ वा-यामुळे संभाव्य अपघात टाळण्यासाठी महावितरणने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. सावधगिरी बाळगा
पाऊसाच्या पाठोपाठ येणा-या अतिवृष्टी,वादळामुळे तुटलेल्या वीजतारा किंवा शॉर्टसर्कीटमुळे दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे व सार्वजनिक ठिकाणी असलेल्या तसेच घरगुती विजयंत्रणा किंवा उपकरणांपासून सावधानता बाळगावी असे आवाहन महावितरणचे येथील उपकार्यकारी अभियंता श्री प्रशांत ठाकरे यांनी केले आहे.
ग्राहकांसाठी महत्वाच्या सुचना
अतिवृष्टी, वादळाने तुटलेल्या विजतारा, विजखांब, रस्त्याच्या बाजूचे फीडर पीलर, रोहित्राचे लोखंडी कुंपण, फ्यूज बॉक्स तसेच घरातील ओलसर असलेले विद्युत उपकरणे, शेतीपंपाचा स्वीचबोर्ड आदींकडे दुर्लक्ष केल्याने दुर्घटना होण्याची शक्यता अधिक असते. या दुर्घटना टाळता येणे सहज शक्य आहे. मुसळधार पाऊस आणि वादळी वारा यामुळे झाडाच्या मोठ्या फांद्या तुटून विजतारांवर पडतात. तसेच झाडे पडल्याने विजखांब वाकला जातो. परिणामी वीजतारा तुटण्याचे प्रकार घडतात. त्यात वीजप्रवाह असण्याची शक्यता असल्याने अशा तुटलेल्या, लोंबकळणा-या वीजतारांपासून सावध राहावे. या तारांना हात लावण्याचा किंवा हटविण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन महावितरणने केले आहे.
पावसाळ्यात घरातील स्वीचबोर्ड किंवा विजेच्या उपकरणांचा ओलाव्याशी संपर्क येणार नाही, याची खबरदारी घ्यावी. घरातील वीजपुरवठ्याला आवश्यक अर्थिंग केल्याची खात्री करून घ्यावी. तसेच ईएलसीबी वापरावे. घरात शॉर्टसर्किट झाल्यास मेनस्वीच तात्काळ बंद करावा. घरावरील दूरचित्रवाणीची डिश किंवा अँटेना वीजतारांपासून दूर ठेवावे. ओल्या कपड्यांवर विजेची इस्त्री फिरवू नये. विजेचे स्वीचबोर्ड किंवा कोणत्याही उपकरणाला पाणी लागणार नाही याची दक्षता घ्यावी. विजेवर चालणारे सर्व उपकरणे स्वीचबोर्डापासून बंद करावे. विशेषतः टिनपत्र्याच्या घरात राहणा-या नागरिकांनी पावसाळ्यात अतिदक्ष राहून विजेपासून सुरक्षित राहण्यासाठी उपाय योजना कराव्यात. याशिवाय विजेच्या खांबांना जनावरे बांधू नयेत,त्यास दुचाकी टेकवून ठेऊ नयेत किंवा विद्युत खाबांना तार बांधून कपडे वाळत घालू नयेत असे आवाहन अमळनेर महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.
मदतीसाठी संपर्क क्रमांक
शहरी व ग्रामीण भागातील वीज ग्राहकांसाठी २४ तास सुरु असणा-या कॉलसेंटरचा मोबाईल क्रमांक +917798120155 हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहेत. लॅण्डलाईन टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहे 18002333435.18001023435 कोणत्याही कंपनीच्या मोबाईल फोन किंवा लँडलाईन द्वारे विज ग्राहकांना तक्रार दाखल करता येणार आहे. वीजसेवेच्या तक्रारींसह अतिवृष्टी किंवा वादळामुळे वीजपुरवठ्यात तांत्रिक बिघाड होऊन दुर्घटना होण्याची शक्यता आहे अशा ठिकाणांची माहिती या टोल फ्री क्रमांकावर देण्याची सोय उपलब्ध आहे. तसेच महावितरणच्या टोल फ्री कॉल सेंटरमध्ये ग्राहकांना केवळ एकदाच ग्राहक क्रमांक सांगावा लागणार आहे. वीज ग्राहकाने कॉल सेंटरमध्ये रजिस्टर्ड केलेल्या तीनपैकी कोणत्याही वैयक्तिक दूरध्वनी किंवा मोबाईल क्रमांकावरून तक्रार केल्यास फक्त तक्रारीचा तपशील सांगावा लागणार आहे. तसेच महावितरणच्या मंडळ स्तरावरील नियंत्रण कक्ष येथे संपर्क साधता येईल.अतिवृष्टीमुळे कोणत्याही क्षणी प्रतिकूल स्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून रोहित्र आणि वीजपुरवठा बंद करण्यात येतो. अशा स्थितीत संभाव्य धोका टाळण्यासाठी नागरिकांनी महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
No comments
Post a Comment