*अमळनेर* : मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी अमळनेर मतदार संघात केलेला शाश्वत विकास जनतेला दिसत असून विरोधकांना तो दिसणार नाही,मतदार संघात यावेळी जातीभेद नसून विकासावर जनता खुश आहे, आणि विकासावरच प्रेम करणारे लोक असल्याने अनिलदादा मोठ्या फरकाने यंदाही विजयी होतील असा दावा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भागवत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.
दोन दिवसांपूर्वी माजी आमदार शिरीष चौधरी यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध आरोप अनिल पाटील यांच्यावर केले असल्याने सदर आरोपांना उत्तर देण्यासाठी महायुतीच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली.यावेळी भाजप तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील,शहराध्यक्ष विजय राजपूत, सेनेचे तालुकाप्रमुख प्रथमेश पवार,शहर प्रमुख संजय पाटील,राष्ट्रवादी शहराध्यक्ष मुक्तार खाटीक उपस्थित होते.
यावेळी विविध आरोपांचे खंडन करताना भागवत पाटील
म्हणाले की,माजी आमदार अनिल दादांना माजी म्हणत आहेत पण २६ नोव्हेंबर २०२४ पर्यंत आमदार व मंत्री पदावर ते कायम आहेत.धरणाच्या ४८०० कोटीच्या सुप्रमाला ते साधी म्हणतात पण ती साधी नाही,१५ वर्षांतर सुप्रमा मिळाली असून शिरीष चौधरींनी देखील एक सुप्रमा आणली हा त्यांचा दावा खोटा आहे,उलट याच धरणाला माजी आमदार पांढरा हत्ती म्हणायचे.१९९८ पासून निम्न प्रकल्प सुरू होऊन आज २६ वर्ष झाली. आपण सर्वांचा कार्यकाळ पहिला,मात्र पाच वर्षात साडेचारशे कोटी अनिल दादांनी आणले असून आज धरणाचे झालेले काम दृश्य स्वरूपात दिसते.विकासाच्या बाबतीत बोलायचे झाले तर प्रत्येक गावात ग्रा.पं.आणि तलाठी कार्यालय बांधकाम, इतर मूलभूत सुविधांची कामे,रस्ते,शेतकरी बांधवांसाठी ५० गावात शेत जोड रस्ते दिले आहेत.आणि ठोस काम सांगायचे झाल्यास शहरात उभी राहत असलेली प्रशासकीय इमारत,सर्व कार्यालय येथे येणार असल्याने सामान्य माणसाचे हेलपाटे थांबणार आहेत.पं.स.इमारत बांधकामही सुरू झाले आहे.बस स्टँड कामासाठी १० कोटी रूपये मिळाल्याने नवीन होणार आहे.शहरात नवीन रस्ते,डीपी रोड, दगडी दरवाजा, मंगळ मंदिरासाठी २५ कोटी मंजूर केले आहेत.मदत व पुनर्वसन विभागाच्या माध्यमातून काय केले यावर आमचे उत्तर आहे की तालुक्यातील कोणत्याही शेतकरी बांधबांचे बँक स्टेटमेंट बघा कोणाच्या खात्यावर किती पैसे आलेत ते दिसेल,तब्बल साडे सहाशे कोटी आमच्या शेतकरी राजाला गारपीट,पीकविमा,अवकाळी पाऊस या माध्यमातून मिळाले आहेत.मतदारसंघात लहान मोठे बंधारे बांधून सिंचन क्षमता वाढवली गेली आहे,मुडी, मांडळ व फाफोरे येथे ब्रिटिश कालीन फळ बंधाऱ्याचा प्रश्न मार्गी लावला आहे.त्यामुळे विकसाच्या बाबतीत तरी विरोधकांनी बोलूच नये असे सांगत गुंडगिरीचे समर्थक कोण हे जनतेला माहीत असुन माजी आमदारांचा गुन्हेगारासोबत असलेले सेल्फी चे चित्र त्यांनी पत्रकार परिषदेत सादर केले.आणि निवडणुका कायदा व सुव्यवस्था राखून खेळीमेळीच्या वातावरणातच होतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
भाजपातून ते निलंबीतच
माजी आमदार शिरीष चौधरी यांना भाजपने पक्षातून
निष्कासित केले असल्याचे पत्र त्यांनी यावेळी सादर करत त्यांचा पक्षाशी काहीही संबंध राहिला नसल्याचा खुलासा भागवत पाटील यांनी केला.श्री चौधरी हे पत्र बनावट असल्याचे सांगत असल्याचे पत्रकारांनी म्हटले असता भाजपाचे तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील यांनी या पत्राबाबत आम्ही पक्ष श्रेष्ठींकडे खुलासा केला असता त्यांनी पत्र अधिकृत असल्याचा दुजोरा दिला असून याठिकाणी जे जे पक्ष विरोधी कारवायांमध्ये सहभागी असतील त्यांच्यावर देखील कारवाई होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
No comments
Post a Comment