होय,मंत्री महोदय अनिल पाटील तुमचं चुकलेच....तरीही आम्ही तुमच्या पाठीशी !

Monday, November 11, 2024

/ by Amalner Headlines
प्रा.सुरेश पाटील यांनी मांडली भुमिका

*अमळनेर* :  मंत्री अनिल दादा पाटील,आज तुम्ही अमळनेर शहरात आणि तालुक्यात जी विकासाची गंगा आणली आहे त्यापेक्षा तुम्ही तालुक्यातील जनतेच्या व्यथा समजून घ्यायला पाहिजे होत्या.ज्यांनी तुम्हाला  २०१९ मध्ये निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली त्यांच्यासाठी तरी किमान,मुंबईच्या फेऱ्या मारण्यापेक्षा गावोगावी जाऊन त्यांच्या सुखदुःखात सहभागी व्हायला पाहिजे होते, भले शहराचा,तालुक्याचा विकास झाला नसता तरी चाललं असते, अमळनेर शहर आणि तालुका विकासाच्या बाबतीत आणखी ५ वर्ष मागे गेला असता,याशिवाय आणखी दुसरं काय झालं असत, दादा तुमचं चुकलंच, तुम्ही अमळनेर शहराला प्रगतीची वाट दाखवली. त्यामुळे प्रशासकीय इमारत,पंचायत समिती,बस स्थानक, ७०कोटींचा बायपास रस्ता,कॉलनी भागातील शेकडो रस्ते ही मोठी कामे होऊ शकली,ती झाली नसती तरी काय बिघडले असते. आज धरणाचे प्रस्तंभ जमिनीपासून वर आले आहेत,धरणाच्या सुप्रमा आणि बांधकामासाठी निधी मिळावा यासाठी तुम्ही दिल्ली,मुंबई वाऱ्या केल्या त्यापेक्षा दादा तुम्ही ४२ खेड्यांकडे लक्ष द्यायला पाहीजे होते. धरणाला पांढरा हत्ती संबोधणाऱ्यांपैकी तुम्ही नाहीत हेच मोठं दुर्भाग्य,धरणासाठी झटण्यापेक्षा मतदार संघातील  गावातील आपल्या कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन त्यांची विचारपूस केली असती तर बरं झालं असत, हेच धरण म्हणजे आता तुम्हाला मरण यातना देणार आहे नाही का? अमळनेर तालुक्यातील भावी पिढी, सुखी व्हावी,आपला कार्यकर्ता सक्षम व्हावा यासाठी धरण बंधारे बांधण्यापेक्षा कार्यकर्त्यांच्या वैयक्तिक भेटी घेणे महत्वाचे होते दादासाहेब,दादा तुम्ही ते केलं नाही, त्यामुळे तुमचं चुकलेच. दादा मूळचे भाजपचे कार्यकर्ते.
पडत्या काळात तुम्ही भाजप सांभाळली आहे,मात्र दोन वेळा पडल्या नंतर तुम्ही २०१९ मध्ये पक्षांतर केले.स्वर्गीय उदय वाघ, कृषिभूषण साहेबराव पाटील आणि संपूर्ण मतदार संघाला तत्कालीन आमदारांच्या अवैध धंद्यामुळे अमळनेर शहर आणि तालुक्यातील अख्खी तरुणाई व्यसनाधीन होते की काय? अशी भीती वाटू लागली होती. गल्ली बोळात आडोशात चालणारे जुगार,सट्टा,मटका यांचे क्लब त्या काळात खुलेआम मुख्य रस्त्यांवर, बाजारपेठेत दिसू लागले होते,शहरातील मुख्य चौकात अनेक नवखे गुंडांच्या झुंडीच्या झुंडी दिसुन येत,आपल्या आया बहिणींच्या अंगावर त्यांची नजर सतत फिरायची, त्या टवळखोरांची शेरेबाजी ऐकून,महिला मुलींना खाली मान टाकून मुकाट्याने  हतबल होऊन पुढे मार्गस्थ व्हावं लागायचं,ते थांबलं पाहिजे, अशी भावना प्रत्येक अमळनेरकरांच्या मनात २०१९ मध्ये होती. प्रत्येक गावात अन शहरात गुंडगिरी असते.मात्र त्या गुंडगिरीला राजसत्तेचे पाठबळ मिळाले तर ती फोफावत जाते,नेमके तेच २०१४ते २०१९ या काळात झालं, गुंडगिरी, सट्टा मटका,बोगस दारू यातच तरूणाई बुडाली,शेकडो घरातील तरुणांचा जीव गेला, हे पुन्हा व्हायला नको म्हणून २०१९ मध्ये भूमिपुत्र जन्माला आला आणि शहरात क्रांती झाली अन वरील सर्व गोष्टींना आळा बसला. दादा तुम्ही तुमच्या कार्यकाळात गुंडांना आसरा दिला नाही, हे तुमचं  चुकलंच, तुम्ही गुंडांना पोसायला पाहिजे होते, त्यांच्या साठी किंवा अवैध धंदे करणाऱ्या मुजोर तरुणासाठी पोलीस स्टेशनला फोन करून दबाव आणायला पाहिजे होता.
जेणेकरून अवैध धंद्यातील मिळालेला बक्कळ पैशाच्या जोरावर या गुंडांनी गावात व्यापारी, महिला मुली, किंवा दुर्बलांचे शोषण केले असते तुम्ही तेच तर होऊ दिले नाही,आणि याचं मोल आम्हाला नाही,
म्हणून दादा आपले चुकलेच.
राज्यात सत्तांतर झाले आणि आमदाराचे तुम्ही मंत्री झाले, अमळनेरात काही लोकं याला गद्दारी म्हणतात, ती तुम्ही करायलाच नको होती,सत्तेत गेल्यामुळे आपल्या गावांच्या,
शहराच्या विकासासाठी जो करोडो रुपयांचा भरघोस निधी मिळाला त्यापेक्षा फक्त वार्षिक ५  कोटीच्या आमदार निधीवरच तुम्ही समाधान मानले असते तर बरं झालं असतं. त्या ५ कोटींवर अमळनेर मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलवण्याची भाषा कोणी  केली असती तर त्याला आज जे टीका करतात त्यांनीच उत्तर दिलं असतं,किंवा मी विरोधी पक्षात आहे,निधीच मिळाला नाही,अशी बोळवण करता आली असती,  असे सांगता आले असते,पीक विमा किंवा शेतकऱ्यांना नुकसानीची आज जी भरपाई मिळाली आहे,हजारो शेतकऱ्यांना उत्पन्नापेक्षा अधिक नुकसान भरपाई मिळाली आहे,ती केवळ सत्तेत गेल्यामुळे, मंत्रीपदामुळे,मात्र आम्ही हे सर्व विसरलो आहोत,यापेक्षा तुम्ही 
 सत्तेत गेले नसते तर आमचं करोडो रुपयांचे नुकसान झाले असते, ते आम्ही सोसले असते कारण आम्ही मनाने श्रीमंत आहोत, आणि या श्रीमंती पुढे आम्हाला पीक विमा, अवकाळी नुकसान भरपाई,करोडो चा विकास निधी तुटपुंजा वाटतो. असो,आज ज्यांना पीक विमा मिळाला नाही ते आज तुमच्यावर आगपाखड करत आहेत.
त्यांचेही योग्यच आहे,कारण आपत्ती व्यवस्थापन खात्याचे मंत्री असूनही चाळीसगावला मदत मिळते आणि अमळनेरला मिळत नाही,दुष्काळ जाहिर होत नाही, हे योग्य नाही. जे शेतकरी ज्यांना पीक विमा मिळाला नाही, नुकसान भरपाई मिळाली नाही ते १२० किलोमीटरवरून येणाऱ्या माजी आमदारांच्या मागे आज उभे आहेत,जनतेने त्यांना संधी दिली तर कदाचित  शेतकऱ्यांना भावी काळात पीक विमा मिळेल, पण त्याबदल्यात अमळनेरकरांना अनेक गोष्टींची किमंत मोजावी लागणार, हे विशेष.
        अहो,स्वातंत्रोत्तर पहिल्यांदा तुमच्या रूपाने अमलनेरला लाल दिवा मिळाला, म्हणून आम्ही इतका विकास पाहू शकलो, मंत्री असण्याचा आणि आमदार असण्याचा काय फरक असतो,ते आम्ही सुद्धा पहिल्यांदा अनुभवले,म्हणून पश्चिम महाराष्ट्राचा इतका झालेला विकास कशा मुळे आहे ? हे सुद्धा समजले,यंदा तुम्ही निवडून आलात तर तुम्ही पुन्हा मंत्री होणार अन तुम्ही पाहिलेले धरणाचे स्वप्न पूर्ण होणार,उर्वरीत खेड्यांचा विकास होणार,रस्ते होणार,पण हे आता शक्य नाही, कारण आम्हाला विकास नकोय,आम्हाला फक्त आमच्या वैयक्तिक कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होणारा आमदार,हवा आहे,नमस्कार करणारा, गोड बोल्या.... अन ....टिम्ब टिम्ब असो.. दादा तुमचे काही अवैध धंदा नाही. जसे १२० किलोमीटर वरून येणाऱ्या उद्योगपती माजी आमदाराला विस्कळीत झालेल्या अवैध धंद्याची सेटिंग लावायची आहे,त्यांच्या अवैध धंदेवाईक मित्रांना पुनः सेट करायचे आहे आणि म्हणून ते महाशय सध्या भूलथापा देऊन गोरगरीब जनतेची माथी भडकावून मतांचे राजकारण करत आहे, ते यशस्वी झाल्यास किंमत मोजावी लागेल ती प्रत्येक अमळनेरकराला. म्हणून अजून ही वेळ गेलेली नाही, मित्रहो उठा,जागे व्हा,जो करतो तोच चुकतो,जो पडल्या नंतर जबाबदारी झटकून पळून जातो,तो कधीच आपला नसतो,तो जरी आपला असल्याचे आपल्याला दाखवतो तरी त्यात त्याचा स्वार्थ असतो....मी हे सर्व जाणतो म्हणून मी अनिल दादांच्या पाठीशी आहे,तुम्हाला हे पटलं तर तुम्ही ही अनिल दादाला साथ द्या...अन्यथा पुढे येणाऱ्या संकटापासून तुम्हाला कोणीही वाचू शकत नाही कारण अमलनेरचे भुसावळ व्हायला वेळ लागणार नाही 

आपला
प्रा.सुरेश पाटील
कार्याध्यक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अमळनेर 
माजी सरपंच- एकरुखी ता अमळनेर

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines