अतिक्रमित टपरीधारकाची नपाच्या अतिक्रमण विभाग प्रमुखाला मारहाण

Thursday, December 19, 2024

/ by Amalner Headlines

पोलीसात गुन्हा दाखल,कठोर कारवाईची अपेक्षा

अमळनेर - येथील नगर परिषदेचे अतिक्रमण विभाग प्रमुख श्री राधेश्याम अग्रवाल हे शहरातील कोंबडी बाजार भागात कर्तव्यावर असतांना त्यांना दोघांनी मिळून मारहाण केल्याची घटना काल दिनांक १८ डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली. रस्त्यालगत अतिक्रमित जागेवर टपरी ठेवण्याच्या मुद्दयावरून ही घटना घडली आहे. याबाबत पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल करण्यात आली आहे. तर आपल्या कर्मचा-याबाबत घडलेल्या घटनेत त्यांच्या पाठीशी उभे रहाण्याची ठोस भुमिका मुख्याधिकारी यांनी घेतली नसल्याची चर्चा होत आहे.
काय आहे घटना
      शहरातील कोंबडी बाजार भागात रस्त्याचे सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी अतिक्रमण विभागाचे प्रमुख श्री राधेश्याम अग्रवाल हे कामावर हजर होते. त्याठिकाणी जितेंद्र रंजन साळुंखे व दशरथ रंजन साळुंखे हे दोघे भाऊ आले. त्यांनी आपली अतिक्रमणात असलेली टपरी तुटू देऊ नका असे श्री अग्रवाल यांना सांगितले. याविषयी मी निर्णय देऊ शकत नाही. आपण मुख्याधिकारी यांना भेटा असे सांगितल्याचा राग आल्याने जितेंद्र व दशरथ साळुंखे यांनी श्री राधेश्याम अग्रवाल यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण व शिवीगाळ केली व जिवे मारण्याची धमकी दिली. सदर घटनेची अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल करण्यात आली आहे. शासकीय कर्मचा-यास कामावर असतांना मारहाण,शिवीगाळ करणे गंभीर गुन्हा आहे. याप्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईची मागणी श्री राधेश्याम अग्रवाल यांनी केली आहे.
मुख्याधिकारी यांच्या भुमिकेवर प्रश्नचिन्ह ?
          आपल्या कर्मचा-याबाबत काही अनुचित प्रकार घडल्यास  वरिष्ठांनी त्याच्या पाठीशी उभे रहाणे अपेक्षित असते. पण कालच्या घटनेत नपाचे मुख्याधिकारी श्री तुषार नेरकर यांनी तशी भुमिका घेतली नाही अशी चर्चा होत आहे. याउलट प्रकरण वाढवू नका मिटवून घ्या असे सांगितले असल्याची माहिती समोर येत आहे. अशी भुमिका घेण्यामागील कारण काय असा प्रश्न निर्माण होत असून पोलीसांनी याबाबत कठोर कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
-------------------------------------
Next Story Older Post Home

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines