अमळनेर - शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या धुळे ते चोपडा मार्गावर चोपडा नाक्यापासून ते के.एल.झवेरी गोशाळेपर्यंतच्या अंतरात न.पा.चे पथदिवे अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत असल्याबाबतचे वृत्त काल अमळनेर हेडलाईन्सने प्रसिद्ध करताच न.पा.प्रशासन खडबडून जागे झाले.काल सकाळी न.पा.च्या पथदिवे विभागाने प्रत्यक्ष कामास सुरुवात केल्याचे दिसून आले.
पथदिवे बसविण्याबाबत नागरिकांनी वेळोवेळी मागणी करूनही पथदिवे सुरू न झाल्याने या भागातील रहिवासी व नेहमी ये-जा करणारे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात होता.बंद पथदिव्यांप्रमाणेच रस्त्यावर जागोजागी पडलेल्या खड्ड्यामुळेही वाहन चालक त्रस्त होते. शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणारा चोपडा रोड हा सर्वाधिक वर्दळीचा रस्ता आहे.चोपडा,जळोद या परिसरात जाणारे प्रवासी व सिंधी कॉलनी,मंगळ ग्रह मंदीराजवळील परिसर व के.एल.झवेरी गोशाळेकडे जाणारे नागरिक याच रस्त्याचा वापर करीत असतात.पथदिवे बंद असल्याच्या बातमीची न.पा.प्रशासनाने दखल घेऊन प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली आहे. विद्युत विभागाचे अभियंता प्रशांत ठाकूर,सुपरवायझर ओम कोळी,आबीद शेख,बाळू माने,दिपक मद्रासी यांनी कार्यवाही सुरू केली. त्यांना विज वितरण कंपनीचे अभियंता वैभव देशमुख व त्यांच्या टीमने सहकार्य केले. नविन पथदिवे बसविल्यामुळे रस्ता प्रकाशमान झाल्याचे दिसून आले. अमळनेर हेडलाईन्सने अत्यंत महत्वाच्या विषयावर वृत्त प्रसिद्ध केल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी धन्यवाद दिले आहेत. न.पा.प्रशासनाचे आभार मानले असून पथदिवे लावण्याबरोबरच रस्त्यावरील खड्डे बुजविण्याकडेही लक्ष घालावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
शहर विकासाचा ध्यास घेतलेल्या नगराध्यक्षा,नगरसेवक व मुख्याधिकारी यांनी या रस्त्याच्या प्रश्नाकडेही लक्ष द्यावे. त्वरीत पथदिवे बसविण्याबाबत व खड्डेमुक्त रस्ता ही संकल्पना साकार करण्यासाठी न.पा.प्रशासनास आदेश द्यावेत अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
No comments
Post a Comment