चोपडा नाका ते गोशाळा मार्गावरील पथदिवे अनेक दिवसांपासून बंद पायाखाली खड्डे अन् माथ्यावर अंधार ...न.पा.चा अजब कारभार

Thursday, December 5, 2019

/ by Amalner Headlines
अमळनेर -
शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या धुळे ते चोपडा मार्गावर  चोपडा नाक्यापासून ते के.एल.झवेरी गोशाळेपर्यंतच्या अंतरात न.पा.चे.पथदिवे अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत आहेत. वेळोवेळी मागणी करूनही पथदिवे सुरू न झाल्याने या भागातील रहिवासी व नेहमी ये-जा करणारे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. पथदिवे बंद तर आहेतच पण रस्त्यावर जागोजागी पडलेले खड्डे वाहन चालकांना आव्हान ठरत आहेत. पायाखाली खड्डे आणि माथ्यावर अंधार...न.पा.चा अजब कारभार असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.नपा प्रशासन नागरिकांच्या प्रश्नावर कार्यवाही करणे तर सोडाच पण फोन घेण्याचेही सौजन्य दाखवित नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.
    शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणारा चोपडा रोड हा सर्वाधिक वर्दळीचा रस्ता आहे.चोपडा,जळोद या भागातील  प्रवाश्यांना व शहरातील सिंधी कॉलनी,मंगळ ग्रह मंदीराजवळील परिसर,शासकीय वसतिगृह,के.एल.झवेरी गोशाळा याठिकाणी ये-जा करणारे याच मार्गाने जात असतात. 
शनि मंदीरापासून पुढील रस्ता खड्डे व अंधारयुक्त झालेला आहे. सिंधी कॉलनीतील नागरिक रात्रीच्या वेळी आपला व्यवसाय आटोपून रात्री उशिरापर्यंत परतत असतात. त्यांना या अंधारातून मार्ग काढत घराकडे यावे लागते. याबाबत न.पा.च्या अधिकारी व पदाधिकारी यांना वेळोवेळी सांगूनही काहीही फरक पडत नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. शहर विकासाचा ध्यास घेतलेल्या नगराध्यक्षा,नगरसेवक व मुख्याधिकारी यांनी या रस्त्याच्या प्रश्नाकडेही लक्ष द्यावे. त्वरीत पथदिवे बसविण्याबाबत व खड्डेमुक्त रस्ता ही संकल्पना साकार करण्यासाठी न.पा.प्रशासनास आदेश द्यावेत अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines