अमळनेर - तालुक्यातील तांदळी येथे गावाबाहेरील मोकळ्या जागेत सचिन शिवाजी पाटील या युवकास कट मारल्याच्या कारणावरून बेदम मारहाण केल्याच्या घटनेत ४ आरोपींना प्रत्येकी एक वर्ष सश्रम कारावास व १-१ हजार रुपये दंड अशी शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे.
सचिन पाटील हा युवक दि.३१ डिसेंबर २०१४ रोजी बेटावदकडून तांदळी गावाकडे येत असतांना गावाबाहेरील मोकळ्या जागेत निलेश परदेशीने दुचाकी अडवून सचिन यास काठीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच त्याने फोनकरून गावातून गणेश सुरेश परदेशी (२८),टिंकल उर्फ योगेश सर्जेराव पाटील (२४) व वासुदेव रतन भिल (२८) सर्व रा.तांदळी यांना बोलवले. त्यांनी देखील सचिन यास मारहाण केली. त्यात त्याच्या डोळ्यास दुखापत झाली.
मारवड पो.स्टे.ला याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन हेडकॉन्स्टेबल जयवंत पाटील यांनी घटनेचा तपास केला. अमळनेरच्या जे.एम.एफ.सी. न्यायालयात सदर खटला चालला. पोलीसांतर्फे सरकारी अभियोक्ता धनंजय देवरे यांनी प्रभावी युक्तिवाद केला. न्या.
एस.एस.अग्रवाल यांनी चारही आरोपींना शिक्षा सुनावली आहे.
चारही आरोपींना प्रत्येकी एक वर्ष सश्रम कारावास व प्रत्येकास एक हजार रुपये दंड अशी शिक्षा न्यायालयाने ठोठावली. दंडाच्या रक्कमेतील दोन हजार रुपये फिर्यादीस भरपाईपोटी देण्यात यावेत असेही निकालपत्रात नमुद करण्यात आले आहे. पैरवी अधिकारी,पोलीस कैलास सोनार,भास्कर पाटील यांनी सरकारी वकीलांना खटल्यात सहकार्य केले.
-----------------------------------------------------------------------------



