अमळनेर बाजार समितीत ३० हजार क्विंटलची विक्रमी आवक पन्नास वर्षात पहिल्यांदाच विक्रमी आवक

--------------------------------------------------------------------------
                   -* जाहीरात * -
----------------------------------------------------------------------------
अमळनेर -
दोन दिवसांच्या सुट्टीनंतर मंगळवारी बाजार समितीत धान्य विक्रीसाठी १८०० वाहने जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्याातील विविध गावांमधून आलेली होती. यातून सुमारे ३० हजार क्विंटलची विक्रमी आवक झाली. गत पन्नास वर्षात पहिल्यांदाच विक्रमी आवक बाजार समितीत आली.
       पहाटे साडेपाचपासून बाजार समितीबाहेर दोन कि.मी.ची रांग थेट पैलाड भागापर्यंत लागली होती, तर बालेमिया ते सुभाष चौक वेगळी रांग लावण्यातआली.
 सकाळी लवकर नऊ वाजेपासून टप्प्या-टप्प्याने ५० वाहनांचा लिलाव करण्यात आला. मोजणी व्यापारी,कर्मचारी यांनी नियमांचे पालन केल्याने खरेदी सुरळीत झाली.
        अमळनेर बाजार समितीत कटती बंद केली व रोखीने पेमेंट मिळते म्हणून जळगाव,धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील विविध तालुक्यातून शेतकऱ्यांनी गहू , दादर, हरभरा, मका, बाजरी विक्रीस आणली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळण्यात आले. रस्त्यावर प्रचंड गर्दी झाल्याने सकाळी सात वाजेपासून सभापती प्रफुल पाटील, विश्वास पाटील, भगवान कोळी, हरी वाणी, शंकर बितराई व इतर स्वत: गेटवर थांबून एका वाहनासोबत चालकाव्यतिरिक्त एकाच शेतक-याला प्रवेश देत होते. गर्दी करणाऱ्यांना हटकत होते. बाजार समिती आवार फुल झाल्यानंतर वाहने टोकन देऊन शेतकी संघ जिनमध्ये उभे राहण्यासाठी सोय करण्यात आली व आवारात विविध ठिकाणी हात धुवायला साबण व पाण्याच्या बादल्या, सॅनिटायझर उपलब्ध होते.
              कोरोनाची भीती आणि लॉकडाऊन नंतर देखील ३० हजार क्विंटल मालाची आवक झाली. गव्हाला कमाल रुपये २,०५६, हरभ-याला कमाल ३,८५०, दादरला कमाल ४,०००, मक्याला कमाल १,४२१ व बाजरीला रुपये कमाल २,३५१ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.
       अनेक वाहनांसोबत तीन ते चार व्यक्ती आल्याने दोघां व्यतिरिक्त इतरांना बाजार समितीत प्रवेश नाकारण्यात आला. बाहेरून आलेल्या या व्यक्ती गावात फिरत होत्या.तसेच व्यापा-यांव्यतिरिक्त काही हौशे- गवशेही खरेदी करण्याच्या बहाण्याने बाजार समितीत फिरत असल्याचे दिसून आले.बाजार समितीत कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी योग्य ती काळजी घेतली जात होती. मात्र आलेल्या जादा लोकांवर बाहेर नियंत्रण ठेवता येणे शक्य नाही. शेतकऱ्यांनी वाहनाबरोबर चालकासोबत एकट्याने यावे, असे आवाहन बाजार समितीतर्फे करण्यात आले आहे.
-------------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.