---------------------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------------
अमळनेर - आपल्या तालुक्यातील कोरोनाचे रूग्ण कमी झाले म्हणजे आपण कोरोना मुक्त झालो असे नाही तर आताही काळजी घेण्याची गरज आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे. अत्यंत महत्वाचे काम असल्याशिवाय कुणीही घराबाहेर पडू नये असे आवाहन अमळनेरच्या उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे यांनी तालुक्यातील नागरिकांना केले आहे. अमळनेर तालुक्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळून आली होती. प्रशासनाने काळजीपूर्वक यात त्रिस्तरीय चाचणी पध्दतीचा वापर करून तपासणी केली. त्यामुळे अधिकाधिक रूग्ण आजारातून मुक्त झाले आहेत असेही पत्रकार परिषदेत माहिती देतांना प्रांताधिकारी सीमा अहिरे यांनी सांगितले. प्रांताधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत तहसिलदार मिलिंद वाघ,वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रकाश ताळे हे उपस्थित होते.
अमळनेर तालुक्यातील रूग्ण संख्या अचानक कमी कशी झाली,नवीन रूग्ण आढळून येत नाही म्हणजे तालुका कोरोना मुक्त झाला आहे का,नवीन संशयित रूग्णांचे स्वॅब का घेतले जात नाहीत असे अनेक प्रश्न नागरिकांत चर्चिले जात आहेत. याबाबत काही अफवा देखील पसरत आहेत यासंदर्भात जनतेत गैरसमज निर्माण होऊ नयेत म्हणून पत्रकार परिषदेच्या माध्यमातून प्रशासनाची भुमिका मांडण्यात आली. त्याचप्रमाणे नागरिकांनी नियमांचे पालन करावे. लॉकडाऊन,जनता कर्फ्यु,जमावबंदी व सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे असे आवाहन उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे यांनी केले आहे.

शासनाचे नवीन निर्देश
कोरोना रूग्णांवर उपचाराबद्दल शासनाने नवीन निर्देश जारी केले आहेत. आपण त्रिस्तरीय पध्दतीने रूग्ण तपासणी केली. रूग्णांचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर पुढील उपचार केले जात होते. योग्य उपचारामुळे रूग्ण वेळेत बरे झाले. तालुक्यातील लोकांना व प्रशासनाने वेळोवेळी जनता कर्फ्यु पाळण्याचे आवाहन केले. नागरिकांनी लॉकडाऊनचे पालन केले. त्यामुळे नवीन रूग्ण आढळून येण्याचे प्रमाण नक्कीच कमी झाले. पण यामुळे जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे. तसेच शहर कोरोना मुक्त झाले आहे असा गैरसमज निर्माण झाला आहे. त्यानंतर नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. तरी जनतेने अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे. जीवनावश्यक वस्तू वगळता इतर कोणतेही दुकान उघडण्यात येणार नाही. अत्यंत महत्वाचे काम असल्याशिवाय कुणीही घराबाहेर पडू नये. विनाकारण रस्त्यावर फिरणारे आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सर्व जनतेने लॉकडाऊनचे उत्स्फूर्तपणे पालन करावे असे आवाहन उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे यांनी केले आहे.
No comments
Post a Comment