-------------------------------------------------------------------------
अमळनेर - आगामी महिन्यात अमळनेर शहराला पाणीपुरवठा अपूर्ण पडू नये म्हणून नगरपालिकेने पहिले आवर्तन घेतले असून हतनूर धरणातून ५ दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात आल्याची माहिती माजी आमदार साहेबराव पाटील यांनी दिली.नपाच्या मागणीची दखल घेऊन तात्काळ आवर्तन सोडल्याबद्दल नगराध्यक्षा सौ.पुष्पलता पाटील यांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत. अमळनेर शहराला तापी नदीवरून जळोद डोहातून पाणीपुरवठा केला जात असून २० मे पर्यंत पाणीसाठा पुरणार होता.नागरिकांना उन्हाळ्यातही नियमित पाणीपुरवठा व्हावा आणि कोरोनाच्या बचावासाठी नागरिकांना वारंवार हात धुण्यासाठी व आंघोळीसाठी भरपूर पाणी लागत असल्याने पुरेसा पाणीपुरवठा व्हावा म्हणून नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांनी मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड यांना पाण्याचे आवर्तन घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार आवर्तन १७ रोजी सायंकाळी ६ वाजता हतनूर धरणातून सोडण्यात आले. हतनूर धरणातून पाणी ६० तासात चहार्डी,घाडवेल मार्गे पाटचारीतून तापी नदीपर्यंत पोहचेल. सुमारे १०५ किमी प्रवास पूर्ण करून तीन दिवसात पाणी जळोद डोहापर्यंत पोहचणार आहे. हतनूर धरणाच्या कालव्याच्या दीड मीटर उंचीच्या प्रवेश द्वारातून पाणी सोडण्यात आले. २४ तासात १ दशलक्ष घनमिटर पाणी धरणातून बाहेर पडणार आहे. त्यामुळे जून महिना संपेपर्यंत पाणी पुरणार आहे.त्यामुळे आगामी काळात अमळनेर शहराला पाणी टंचाई भासणार नाही. कडक उन्हाळ्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन झाले तरी नगरपालिकेने दोन आवर्तने राखून ठेवली आहेत.
प्रशासनाचे आभार
नगर परिषदेच्या मागणीची प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन आवर्तन सोडल्याबद्दल जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे , गिरणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता शिंदे , उपअभियंता निकम यांचे नगराध्यक्षा सौ पुष्पलता साहेबराव पाटील व नगर परिषदेने आभार मानले आहेत.
No comments
Post a Comment