जळगाव - शहरासह जिल्ह्यात आजपासून सर्व दुकाने, वाइन शॉप सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र हॉटेल्स, रेस्टॉरंट, मॉल्स, ब्युटी पार्लर, सलूनची दुकाने बंदच राहतील. सुरू केलेल्या दुकानात नागरिकांनी गर्दी करू नये, सोशल डिस्टन्सींगचे पालन करावेच लागेल, दुकानदार, ग्राहकांना मास्क तोंडाला लावावा लागेल अशी माहिती जळगावचे जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील, महापालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ.ढाकणे
जिल्ह्यात अगोदर कोरोना बाधित एकच रुग्ण होता. त्यात वाढ होऊन आतापर्यंत ५२ बाधित रुग्ण जिल्ह्यात आहे. जिल्हा प्रशासन,पोलिस,आरोग्य प्रशासन,महापालिका,जिल्हा परिषद प्रशासन सर्व त्यांच्या स्तरावरून कोरोना रोखण्यासाठी कार्यरत आहेत. कोरोनामुळे जे मृत्यू झाले त्यांना विविध आजार अगोदरपासून होते, ते कोरोनाचा उपचार घेण्यासाठी उशिराने आले.
जिल्ह्यात येण्यासाठी व जिल्ह्या बाहेर जाण्यासाठी ऑनलाइन परवाने देण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. नागरिकांना पुणे, मुंबई वगळता इतर ठिकाणी जाण्या - येण्यास परवानगी दिली जात आहे. ज्यांना परवानगी देणे शक्य नाही त्यांना परवानगी नाकारली जाते आहे. त्यांनी परत परत अर्ज करू नये.
प्रतिबंधित क्षेत्रावर नजर
ज्याठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले तो परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. जिल्ह्यात एकूण१६ झोन प्रतिबंधित आहेत. त्यातून नागरिकांना बाहेर जाऊ दिले जात नाही,आतही येऊ दिले जात नाही. किराणा, इतर वस्तू त्या परिसरातील नागरिकांना त्यांच्या घरापर्यंत पोचविल्या जात आहेत.
हे सुरू राहणार...
* सर्व प्रकारची दुकाने
* शॉपिंग कॉम्प्लेक्स
* लिकर, वाइन शॉप
* खासगी दवाखाने
* सर्वच कार्यालये ३३ टक्के उपस्थिती
* जीवनावश्यक मालवाहतूक
* उद्योग
* बियाणे, खते विक्री
* फळ, भाजीपाला दूध
* किराणा, मेडिकल दुकाने
* रुग्णवाहिका, शववाहिनी
* पेट्रोल, डिझेल
* धान्य दुकानातून वितरण
हे बंद राहणार..
* शाळा, महाविद्यालये
* एस.टी.बस, रेल्वे, विमान
* हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळ
* पाणीपुरी भेलपुरीची दुकाने
* सलून, ब्युटी पार्लर, स्पा
* जिल्ह्याच्या सीमा
* मॉल्स, सिनेमा थिएटर
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.उगले
पोलिसांना ड्यूटी करावीच लागेल
जिल्ह्यातून मालेगाव येथे बंदोबस्तासाठी गेलेल्यांची गैरसोय होत असल्याची तक्रार तेथील पोलिसांनी केली आहे. त्यावर पोलिस अधिक्षक डॉ.उगले म्हणाले, जेव्हा पोलिस म्हणून भरती होते तेव्हा कोठे नोकरी करावी हे दिलेले नसते. मिळेल त्याठिकाणी नोकरी करावयाची असते. मालेगावला पोलिसांची योग्य सोय आहे. मी तेथे बंदोबस्तासाठी गेलेल्या तीन पोलिसांवर निलंबनाची कारवाई केली आहे. यापुढे अधिक कडक कारवाई करेल.




