--------------------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------------------
अमळनेर - अमळनेरसह शेजारील तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला असतांनाही नागरिक लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे लक्षात आल्याने पुन्हा एकदा जनताकर्फ्यु लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडून अखेर हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा सुरू,अन्य दुकाने बंद
दि.३१ मे ते ६ जून पर्यंत कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे अशी माहिती देण्यात आली आहे. या जनता कर्फ्यु काळात कृषी संलग्न दुकाने,दवाखाने व मेडिकल वगळता सर्व दुकाने व सेवा बंद राहतील अशी माहिती देण्यात आली आहे. जनतेने स्वयंशिस्त पाळावी व महत्वाच्या कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये. प्रशासनाने घेतलेला हा निर्णय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी घेतला आहे याची जाणीव ठेवण्याची गरज आहे.
जनतेचा निष्काळजीपणा धोकादायक
अमळनेर येथील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ११९ वर पोहोचली असली तरीनागरिकांना
त्याचे गांभीर्य अद्याप कळून येत नसल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे. आरोग्य विभाग व प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन होतांना दिसत नाही.
क्षुल्लक कारणांसाठी दररोज बाजारात नेहमी सारखीच गर्दी होत आहे. सोशल डिस्टन्सींग,
मास्कचा व सॅनिटायजरचा वापर या गोष्टी नावापुरत्या शिल्लक असल्याचे दिसते. रूग्ण संख्या १०० पेक्षा अधिक झाल्यानंतर नागरिकांनी काही काळ नियमांचे पालन केले. त्यामुळे नंतरच्या काळात रूग्ण संख्या झपाट्याने कमी झाली. लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू झाल्यावर काही निर्बंध शिथील करण्यात आले. त्यानुसार आपल्याकडे दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली. पण त्यानंतर मात्र प्रशासनाने दिलेल्या नियमांचे उल्लंघन मोठ्या प्रमाणावर होतांना दिसत होते. संपूर्ण प्रशासन याबाबत गांभीर्याने विचार करत होते. शहरातील सुज्ञ नागरिकही सोशल मिडीयावर या निष्काळजीपणा बाबत चिंता व्यक्त करत होते.
अमळनेर हेडलाइन्सने देखील यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केले होते. संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. रूग्ण संख्या कासवगतीने वाढत आहे तर अजून ही दोन दिवसांपूर्वी घेतलेले स्वॅब व काही अहवाल प्रतिक्षेत आहेत.
अमळनेरकर नागरिकांनी दि.३१मे ते ६ जून या कालावधीत घोषित करण्यात आलेल्या जनता कर्फ्युचे पालन करावे व कडकडीत बंद पाळण्यात यावा असे आवाहन लोकप्रतिनिधी व प्रशासनाने केले आहे.
No comments
Post a Comment