---------------------------------------------------------------------------
---------------------------------------------------------------------------
अमळनेर - जळगाव येथील कोविड रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अमळनेर येथील महिला रूग्णाचा तपासणी अहवाल तब्बल १८ दिवसांनी निगेटीव्ह आला.त्यामुळे सदर महिलेस दुस-या दिवशी रूग्णालयातून सुटी देण्यात आली. ती महिला आनंदात घरी येऊन पोहोचली पण हा आनंद अधिक काळ टिकू शकला नाही. कारण सदर महिलेचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. या महिलेला पुन्हा रूग्णालयात दाखल करण्यासाठी आरोग्य विभागाचे वाहन जेव्हा पोहोचले तेव्हा महिला व तिच्या परिवाराने येण्यास नकार दिला. यामुळे स्थानिक अधिकारी वर्गास विशेष प्रयत्न करावे लागले तेव्हा महिला परिवारासह रात्री रूग्णालयात दाखल झाली. या दरम्यान परिसरातील संतप्त नागरिकांनी अधिका-यांना जाब विचारला. तर तहसिलदार यांच्या वाहनावर दगडफेकीची घटना घडली. कोरोना आजारानंतर उद्भवलेल्या परिस्थितीचा प्रशासनावर ताण आहे हे खरे असले तरी पॉझिटीव्ह रूग्णांस निगेटीव्ह सांगून योग्य खातरजमा न करता घरी पाठविणे धोकादायक आहे. आता जनतेत कोरोना बाबत भिती आहे.त्यातच सुमारे अडीच महिने असलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व सामान्य नागरिक आर्थिक संकटात सापडले आहेत. आहे त्या परिस्थितीत आपले कुटूंब कसे सावरता येईल याची कसरत गरीब कुटूंबांना करावी लागत आहे. तशात अशी घटना घडणे संतापजनक आहे. संबंधित प्रशासकीय यंत्रणेने अशा घटना घडू नये याची काळजी घेण्याची गरज आहे.

नागरिकांच्या मानसिकतेचा विचार करावा
अमलेश्वर नगर मध्ये घडलेली घटना दुर्दैवी आहे. पण याआधी संशयित रूग्णांचा मृतदेह नातेवाईकांना दिला आणि नंतर पॉझिटीव्ह अहवाल आला.या घटनेची झळ अमळनेरकर सोसत आहेत.आता घडलेला प्रकारही गंभीर म्हणावा लागेल.असा गलथान कारभार जनतेच्या जीवावर बेतू शकतो. त्यामुळे सदर रूग्णाचा परिवार व परिसरातील नागरिकांनी उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना जाब विचारला.संतापात तहसिलदार यांच्या वाहनावर दगडफेक झाली. अखेर सदर कुटुंबास समजावून सांगितल्यानंतर ते रूग्णालयात दाखल होण्यास तयार झाले.पण अशावेळी नागरिकांच्या मानसिकतेचा विचार होण्याची आवश्यकता आहे. दगडफेकीच्या कृत्याचे कुणीही समर्थन करणार नाही. पण प्रशासनाने त्या नागरिकांची भुमिका लक्षात घेणे गरजेचे आहे अशी चर्चा जनतेत आहे.
No comments
Post a Comment