लॉकडाऊनचे नियम पाळून घरूनच आपल्या प्रेमळ शुभेच्छा आणि आशीर्वाद द्या आमदार अनिल पाटील यांचे जनतेस विनम्र आवाहन,दुःखद घटनांमुळे वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय

------------------------------------------------------------------
           - * जाहीरात * -
-------------------------------------------------------------------
अमळनेर -
येथील मतदार संघाचे भूमिपुत्र आमदार अनिल भाईदास पाटील यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघात काही दुःखद घटना घडल्याने यावर्षी दि.७ जुलै रोजीचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला असून सर्व जेष्ठ श्रेष्ठ,हितचिंतक आणि प्रेमी मंडळींनी देखील लॉकडाऊनमुळे आपापल्या घरी थांबूनच प्रेमळ शुभेच्छा आणि आशीर्वाद द्यावेत असे आवाहन आ.पाटील यांनी केले आहे
            यासंदर्भात बोलतांना आ.पाटील म्हणाले की, खरे तर माझा मतदार संघ लवकरात लवकर कोरोनामुक्त व्हावा हीच माझी इच्छा आणि प्रभुचरणी प्रार्थना आहे,आणि हे साक्षात साकारण्यासाठी प्रत्येकाने स्वतःची आणि कुटुंबाची काळजी म्हणून लॉकडाऊनचे नियम पाळणे अपेक्षित आहे. मला देखील माझ्या प्रत्येक भूमीपुत्रांच्या आरोग्याची तितकीच काळजी असल्याने आपल्या घरी थांबूनच ते मला वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद देतील हे अपेक्षित आहे.या भूमीत जन्मल्यापासून ते आजपर्यंत येथील जनतेने भरभरून प्रेम मला दिले असून जे मागितले ते मिळालेच आहे,
यामुळे त्यांचे ऋण व प्रेम मी कदापिही विसरू शकत नाही.
आपल्या देशाला व भूमीला गेल्या तीन महिन्यापासून कोरोना सारख्या विघातक आजाराने ग्रासले आहे.परिणामी यावर उपाययोजना म्हणून शासनाने लॉकडाऊन जाहीर केल्याने उद्योग धंद्यांची चाके थांबून अनेकांचे रोजगार यामुळे हिरावले गेले आहेत. काही दिवसांपूर्वी लॉकडाऊन शिथिलतेमुळे काही अंशी रोजगार सुरू झाले असले तरी कोरोनाची टांगती तलवार मात्र डोक्यावर कायम असल्याने रोजगारात सातत्य राहिलेले नाही. अश्या अत्यंत संकटमय परिस्थितीत माझी जनता जगत असल्याने याचे अपार दुःख मला आहे. याशिवाय अमळनेर मतदार संघात माझ्या अतिशय जवळच्या व्यक्तींचा कोरोनाने बळी घेतला. यामुळे त्यांचे कुटुंबीय अतिशय दुःखात असून तेवढाच दुःखी मी देखील झालो आहे.त्यामुळे यंदा वाढदिवसानिमित्त कोणतेही कार्यक्रम न करण्याची विनंती मी कार्यकर्ते व हितचिंतकाना केली आहे.
         विकासाच्या उंबरठ्यावर मतदारसंघास नेण्याचा माझा प्रयत्न असतांना आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे या प्रयत्नास कुठेतरी बाधा पोहोचत आहे.  मात्र जनतेच्या आशीर्वादाने विकासाचे नियोजन मुळीच थांबलेले नसून कोरोना युद्धात पुरेश्या उपाययोजना राबवितांना विविध विकासकामांना मंजुरी घेऊन त्याचा पाया रचण्याचे काम जोमाने सुरू आहे.प्रामुख्याने पाडळसरे प्रकल्पाच्या हालचाली गतिमान असून अमळनेर शहरातील दगडी दरवाजाचा प्रश्न सोडविण्यात यशही आले आहे.अशी अनेक कामे मार्गी लागत असल्याने या संकटातही आपण मागे राहणार नाही हा विश्वास मला आहे.तरी मायबाप जनतेने आपले आशीर्वाद आणि प्रेम कायम पाठीशी असू द्यावे, आणि  ७ ते १३ जुलै दरम्यान आपल्या घरीच थांबून लॉकडाऊनचे पालन करावे असे आवाहन आ.अनिल पाटील यांनी केले आहे.
-------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.