----------------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------
जळगाव - खरीप हंगाम सन २०१९-२० मध्ये झालेल्या अवकाळी पावसाने नुकसानीपोटी जिल्ह्यातील १ लाख ४५ शेतकऱ्यांना २०८ कोटी ३४ लाख १३ हजार ६४० रुपयांचा प्रधानमंत्री पीक विम्याचा लाभ मंजूर झाला आहे अशी माहिती राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. येथील अजिंठा शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत पालकमंत्री बोलत होते. पत्रकार परिषदेस जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे महाव्यवस्थापक जितेंद्र देशमुख, धरणगाव पं.स.चे सभापती मुकुंद ननावरे आदी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री ना.पाटील पुढे म्हणाले की, मागील खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात विविध अडचणींना सामारे जावे लागले होते. मात्र राज्य शासन शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहिले. कृषि विभागामार्फत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करुन जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक विमा काढण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार जिल्ह्यातील १ लाख १ हजार ४०३ शेतकऱ्यांनी १ लाख १२ हजार १२६ हेक्टर क्षेत्राचा ३९३ कोटी ७१ लाख ३८ हजार ५१९ रुपयांचा पीक विमा काढला होता व त्यापोटी १८ कोटी ८८ लाख ३१ हजार १८२ रुपयांचा शेतकरी हिस्सा भरला होता. तर उर्वरित हिस्सा शासनाने भरला होता. पीक विमा कंपनीच्या नियमानुसार कापूस पिकासाठी जिल्ह्यातील ८६ मंडळ तर तूर पिकासाठी ६६ मंडळ पीक विम्यासाठी पात्र ठरले होते. त्यानुसार जिल्ह्यातील १ लाख ४५ शेतकऱ्यांना २०८ कोटी ३४ लाख १३ हजार ६४० रुपयांचा प्रधानमंत्री पीक विम्याचा लाभ मंजूर झाला असून सदरची रक्कम विमा कंपनीमार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची कार्यवाही सुरु झाल्याची माहितीही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.
पालकमंत्री म्हणाले की, जिल्ह्यात खतांची टंचाई नाही. तथापि,माल धक्क्यावरील काही हमाल कोरोना बाधित आढळून आल्याने रॅक उतरविण्यात अडचण येत होती. परंतु आता पाचोरा येथे खते उतरवून पोहोच करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरुन जावू नये. जिल्ह्यातील कापूस व मका खरेदीबाबत बोलतांना ते म्हणाले की, जिल्ह्यात आतापर्यंत ९० लाख क्विंटल कापसाची तर ९ लाख क्विंटल मका खरेदी करण्यात आली आहे. केळी पिकाच्या विम्याचे निकष केंद्र शासनाने बदलले असून ते पूर्ववत करण्याची मागणी राज्य शासन केंद्राला करणार त्याचबरोबर
१३०३ बटालियनचे प्रशिक्षण केंद्र हे जिल्ह्यातच राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या वर्षभरात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी ६०० कोटी रुपये, केळी फळपीक विम्याचे २७५ कोटी रुपये तर आता पिक विम्याचे २०८ कोटी असे एकूण १०८३ कोटी रुपयांची मदत शासनाने दिली आहे.
*३१ जुलै पुर्वी पीक विमा काढावा*
नैसर्गिक आपत्तीमुळे भविष्यात होणारे नुकसान टाळण्यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ३१ जुलैपूर्वी पिक विमा काढण्याचे आवाहनही पालकमंत्री ना. पाटील यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केले आहे.
*तालुकानिहाय पिक विमा मिळालेल्या शेतकरी संख्या (कंसात रक्कम)*
अमळनेर - २८३८२ (५७ कोटी २५ हजार ७४५)
भडगाव - ३००४ (२ कोटी १६ लाख ६२ हजार ६९)
भुसावळ - ४९२ (२ कोटी २२ लाख ७० हजार ४२४)
बोदवड - १८६९ (४ कोटी ७२ लाख ५७ हजार १२७)
चाळीसगाव - ६२५३ (९ कोटी २३ लाख ७६ हजार ६५२)
चोपडा - ८१७६ (२२ कोटी ४५ लाख ४९ हजार ६८९)
धरणगाव - ६३२२ (१३ कोटी ९५ लाख १२ हजार २०)
एरंडोल - ३३९७(६ कोटी ९८ लाख ६४ हजार ३५)
जळगाव - २१२१(५ कोटी २९ लाख ६३ हजार १०७)
जामनेर - १८१०१ (४२ कोटी ३५ लाख ९६ हजार ६९७ )
मुक्ताईनगर - २००६ (३ कोटी ८० लाख ६९ हजार ६५१)
पाचोरा - ४०३२ (१० कोटी ९६ लाख ३५ हजार ५५७)
पारोळा - १२९६२(२५ कोटी ११ लाख २० हजार ६७९ )
रावेर - १०७६( १ कोटी१९ लाख ३६ हजार २६९)
यावल - १८५२ (१ कोटी ८५ लाख ७३ हजार ९१२)
No comments
Post a Comment