-------------------------------------------------------------------
अमळनेर - कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून स्थायिक पातळीवर लॉकडाऊन दर सोमवारी जनता कर्फ्यु पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर दररोज व्यापारी व इतर आस्थापनांना सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील असे निवेदन तहसिलदारांनी जारी केले आहे.तर काही व्यापारी बांधवांनी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंतची वेळ व्यवहारासाठी योग्य असल्याचे मत व्यक्त केले आहे.
दर सोमवारी आता जनता कर्फ्यु
अमळनेरचे प्रांताधिकारी सीमा अहिरे यांचे दालनात व्यापारी संघटना प्रतिनिधी व प्रशासन यांची बैठक घेण्यात आली. बैठकीत ठरल्याप्रमाणे आता दर सोमवारी जनता कर्फ्यु पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांनी शासनाच्या निर्देशांचे पालन करावे. सोशल डिस्टन्सींग,मास्क व सॅनिटायजरचा वापर,नो व्हेईकल झोन या नियमांचे सर्वांनी पालन करावे. तसेच निश्चित केलेल्या पार्किंगमध्ये आपली वाहने उभी करावीत. या नियमांचे उल्लंघन करणा-यांवर कारवाई करण्यात येईल. तसेच व्यापारी बांधवांनी शासन निर्देश पाळण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे यांनी केले.
दररोज सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास मुभा
अनलॉक सुरू झाल्यानंतर आपली दुकाने कोणत्या काळात उघडता येतील या बाबत व्यापारी बांधवांमध्ये संभ्रम होता. आता जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जारी केलेल्या निर्देशानुसार अमळनेर शहरातील व्यापारी व इतर आस्थापनांना सकाळी ९ ते सांयकाळी ७ पर्यंत उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. याबाबतचे पत्रक तहसिलदार मिलिंद वाघ यांनी प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे अमळनेर शहरातील दुकाने आज पासून वरील निर्धारित वेळेत सुरू रहातील.
व्यवहारासाठी सकाळी ९ते सायंकाळी ५ ही वेळ योग्य
याबाबतही काही व्यापारी बांधवांनी वेगळे मत व्यक्त केले आहे. लॉकडाऊन कालावधी पूर्ण झाल्यानंतर सुरूवातीला सकाळी ९ ते दुपारी ३ असा कालावधी दुकाने उघडण्यासाठी दिला होता. त्यात नंतर वाढ करून तो सायंकाळी ५ वाजेपर्यंत करण्यात आला होता. दि. ७ ते १३ जुलै दरम्यान झालेल्या लॉकडाऊन नंतर आता सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत व्यवहार सुरू ठेवण्यास मुभा दिली आहे. ही वेळ सायंकाळी ५ वाजेपर्यंतच राहीली असती तरी चालले असते असे मत व्यापारी बांधवांनी व्यक्त केले आहे. बॅंकेचे व्यवहार दुपारी तीन वाजेपर्यंत सुरू असतात. तर शहरी व ग्रामीण भागातील ग्राहक दुपारीच खरेदी आटोपून घेत असल्याने सायंकाळी ग्राहकांची फारशी वर्दळ बाजारपेठेत नसते अशी सध्याची स्थिती आहे. केवळ फिरणारे या वेळेचा फायदा घेऊन गावात फिरत असतात तरी दुकाने सुरू ठेवण्याबाबतच्या निर्णयाचा प्रशासनाने पुनर्विचार करावा व त्यानंतरचा कालावधी व्यापारी बांधवांना दुकानात मालाची ने - आण करण्यासाठी वापरता येऊ शकतो त्यादृष्टीने विचार करावा अशी मागणीही व्यापारी बांधवांनी केली असल्याचे समजते. आता याबाबतचा निर्णय प्रशासनावर अवलंबून आहे.
No comments
Post a Comment