'ब्रेक द चेन' च्या नियमांचे नागरिकांनी पालन करावे - जिल्हाधिकारी डॉ.अभिजित राऊत विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांचा इशारा

Saturday, May 15, 2021

/ by Amalner Headlines
पत्रकार परिषदेत विविध विषयांवर दिले निर्देश
---------------------------------------------------------------------
                              - * जाहीरात * -
-----------------------------------------------------------------------
जळगांव - कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने लागू केलेल्या ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत निर्बंधांची प्रशासनातील सर्व स्तरावरून अंमलबजावणी केली जात असून केवळ नागरिकांच्या बेशिस्तपणा मुळे बाधित रुग्णसंख्या वाढत असल्याचे दिसून येत असून ही अतिशय चिंतेची बाब आहे. म्हणून नागरिकांनी सहकार्य करावे व कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यापुढे नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने नियमांचे पालन करावे. अन्यथा प्रशासनास कठोर कारवाई करावी लागेल असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत राऊत यांनी आज दिला. जळगाव येथील पोलीस मुख्यालयातील प्रेरणा सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. भीमाशंकर जमादार, महापालिकेचे उपायुक्त संतोष वाहुळे यांचेसह विविध विभागांचे अधिकारी, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
लॉकडाऊनचे निर्बंध अधिक कठोर होणार
प्रशासन निर्बंधांची अंमलबजावणी प्रभावीपणे करत असून जिल्ह्यात काही नागरिक अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली विनाकारण घराबाहेर पडत आहेत. परिणामी असे नागरिक स्वत:बरोबरच दुसऱ्यांनाही बाधित करत असतात. तसेच लसीकरणासाठी अनावश्यक गर्दी करणारे नागरिक, कोरोना बाधित रुग्णांसोबत दवाखान्यात गर्दी करणारे नातेवाईंक, अरुंद गल्ली बोळांत बेकायदेशीरपणे भाजीपाला विक्रेते थाटत असलेली दुकाने आणि त्यावर होणारी गर्दी,काही नागरिक सकाळी ७ ते ११ वाजेदरम्यान किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळविक्री दुकानांवर विनाकारण गर्दी करणा-या नागरिकांमुळे कोरोना आटोक्यात येण्यात अडथळे येत असल्याचे सांगून जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, प्रशासनाने या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून ३१ मे पर्यंत लॉकडाऊनचे निर्बंध अधिक कडक करण्याचा निर्णय घेतला असून तसे आदेश सर्व संबंधित यंत्रणांना दिले आहेत.
लसीकरणासाठी आदल्या दिवशीच कुपन
लसीकरणासाठी सर्व केंद्रावर होणारी गर्दी लक्षात घेता आरोग्य विभागाने उपलब्ध डोसनुसार आदल्या दिवशीच दुपारी ४ वाजेनंतर संबंधित लसीकरण केंद्रांवर कुपनचे वाटप करावे. म्हणजे दुस-या दिवशी अनावश्यक होणारी गर्दी टाळता येईल. शिवाय सर्वांना लस उपलब्ध होईल.
रुग्णालयात नातेवाईकांची गर्दी नको
कोरोना रुग्णांची आरोग्य विभागाकडून आवश्यक ती काळजी घेतली जात आहे असा विश्वास त्यांच्या नातेवाईंकांना वाटावा यासाठी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईंकांमध्ये व्हीडीओ काॅलद्वारे संवाद साधू द्यावा. जेणेकरून नातेवाईक रुग्णांना भेटण्यासाठी दवाखान्यात गर्दी होणार नाही.यासाठी आवश्यक नियोजन करण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी डॉ. अभिजित राऊत यांनी सर्व संबंधितांना दिल्या.
विनाकारण फिरणा-यांवर कठोर कारवाई - डाॅ. मुंढे
   जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी प्रशासनाने दिलेल्या वेळेनंतरही काही नागरीक विनाकारण बाहेर फिरतांना दिसत असून पोलीस त्यांच्यावर योग्य ती कारवाईही करत आहेत. परंतु यापुढे अशा विनाकारण फिरणाऱ्यांवर अधिकाधिक कडक कारवाई करण्याच्या सूचना सर्व पोलीस, गृहरक्षक दलाच्या कर्मचाऱ्यांना दिलेल्या आहेत. यापुढे नागरिकांनी अशाप्रकारे विनाकारण बाहेर फिरणे टाळावे. अन्यथा गुन्हे दाखल होण्यासारख्या कठोर कारवाईस सामोरे जावे लागेल. असा इशारा पोलीस अधिक्षक डाॅ. मुंढे यांनी दिला. आपल्या जीवापेक्षा काहीही महत्त्वाचे नसल्याने नागरीकांनी त्यास महत्त्व देऊन आपल्यासह सर्वांना सुरक्षित ठेवण्याचे आवाहनही डॉ.मुंढे यांनी केले.

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines