-------------------------------------------------------------------
अमळनेर - शहराची प्राचीन ओळख असणारा दगडी दरवाजा चा बुरुज ढासळला आहे. त्या पार्श्वभूमीवर दगडी दरवाजाची दुरूस्ती करण्याची मागणी जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य पंकज चौधरी यांनी पुरातत्व विभाग,जिल्हाधिकारी,प्रांताधिकारी,मुख्याधिकारी यांच्याकडे वेळो वेळी केली होती. प्रशासनाने आश्वासन देऊनही अद्याप कामास सुरुवात झालेली नाही. यास केवळ नपा प्रशासनाची दिरंगाई जबाबदार आहे असा आरोपही श्री चौधरी यांनी केला आहे. आज प्रशासनाशी चर्चा करण्यासाठी आंदोलनकर्ते गेले पण मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड या उपस्थित नव्हत्या. आंदोलकांनी त्यांच्या खुर्चीला हार घातला व निषेध व्यक्त केला. यापुढे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
दुर्लक्ष हेतूपुरस्सर की राजकीय हेतूने❓
दगडी दरवाजाचा बुरूज कोसळल्यानंतर त्याची दुरूस्ती करण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. तरीही कामाची सुरुवात न झाल्याने श्री पंकज चौधरी यांनी दि. ४ जून रोजी मुख्याधिकारी यांना निवेदन दिले होते. त्यात म्हटले आहे की,अमळनेर
शहराला सदैव इतिहासाची साक्ष देणारा प्रेरणादायी दगडी दरवाजा सुमारे २ वर्षांपूर्वी ढासळला असून राजकीय खेळा मुळे की हेतुपुरस्कर दुर्लक्षामुळे सुमारे ऑक्टोबर २०२० पासून कार्यारंभ आदेश देऊन देखील कामात आज पर्यंत कुठलीही विशेष प्रगती दिसत नाही.मागील काळात संबंधित ठेकेदार यांना फार मोठ्या आजाराला सामोरे जावे लागले याची आम्हास जाणीव आहे. परंतु त्यावर काही तरी मार्ग काढणे आवश्यक असतांना देखील आपल्या विभागा मार्फत विशेष दुर्लक्ष केले जात आहे.येणाऱ्या१० दिवसात जर युद्ध पातळीवर काम सुरू नाही झाले तर आम्ही उग्र आंदोलन छेडू अश्या आशयाचे निवेदन पंकज चौधरी यांनी दिले होते.
उप मुख्याधिका-यांशी झाली चर्चा
आज दि.१६ जून २०२१ पर्यँत प्रशासनाने कुठलीही दखल न घेतल्याने आज नगरपरिषदेस तरुण,जागृत युवा कार्यकर्त्यांनी भेट देत विचारणा केली असता मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड अनुपस्थित होत्या त्यामुळे गांधीगिरी करत मुख्याधिकारी यांच्या खुर्चीला फुलांचा हार घालून सदर शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आज पासून आंदोलनाला सुरवात करत आहोत असे चौधरी यांनी मत व्यक्त केले.मुख्याधिकारी अनुपस्थित असल्याने उपमुख्याधिकारी श्री संदीप गायकवाड यांनी त्यांच्या दालनात कार्यकर्त्यासोबत चर्चा केली.याप्रसंगी पंकज चौधरी ,माजी उपनगराध्यक्ष गोपी कासार, सामाजिक कार्यकर्ते सौ.जयश्री दाभाडे,नाविदभाई शेख, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब संदानशिव तथा ब्रिजलाल पाटील,राकेश चौधरी, नाजीमभाई मेंबर,भूषण भोई,निखिल पाटील,तेजस पाटील,राजे संभाजी मित्र मंडळ, शिवशक्ती मित्र मंडळ,जय बजरंग मित्र मंडळाचे मोजके कार्यकर्ते उपस्थित होते.उद्या पासून शहरातील विविध क्षेत्रातील जेष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते,व्यापारी बांधव यांचा सोबत चर्चा करून वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्यात येईल व अंदरपुरा,सराफ बाजार,पानखिडकी,वाडी चौक,कसाली मोहल्ला भागातील नागरिकांच्या साठी पायी रस्ता आता तरी सुरू करण्यात यावा अशी देखील मागणी करण्यात आली.


