दुकाने सुरू ठेवण्याची वेळ मर्यादित करता येऊ शकते का❓- नागरिकांत चर्चा
-----------------------------------------------------------------------------
अमळनेर - राज्य शासनाने राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू केली आहे. जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत यांनी नियमावली जाहीर केली आहे. त्यात अत्यावश्यक सेवांसह सर्व दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यातच नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर बाजारात गर्दी केल्याने प्रशासन व समाजमन हादरले आहे. अशीच परिस्थिती राहिली तर संभाव्य तिसरी लाट निश्चित येईल अशी भिती व्यक्त केली जात आहे. आता पुन्हा लॉकडाऊन न परवडणारा आहे याची जाणीव होणे गरजेचे आहे.नियमात सुट आणि बाजारात गर्दी
दि.७ जून पासून जिल्ह्यात सर्व प्रकारची दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. दुकाने सुरू ठेवण्याची वेळ सकाळी ९ ते रात्री ९ अशी करण्यात आली आहे. पण त्यानंतर नागरिकांनी बाजार अथवा सार्वजनिक ठिकाणी ज्या बिनधास्तपणे गर्दी केली ते भितीदायक व चिंताजनक आहे. अजूनही गर्दीचा महापूर कमी झाला आहे असे म्हणता येणार नाही.
दुकानांची वेळ मर्यादित करा
प्रशासनाने दुकाने सुरू ठेवण्यासाठी सकाळी ९ ते रात्री ९ अशी वेळ निर्धारित केली आहे. खरे म्हणजे दुपारी असणारे कडक ऊन यामुळे दुपारनंतर बाजारात गि-हाईकांची गर्दी कमी होते. ग्रामीण भागातील ग्राहक सार्वजनिक वाहतूक साधनांचा विचार करता दुपारीच खरेदी आटोपून घेत गावाकडे परत जात असल्याचे दिसून येत आहे. मग सायंकाळी क्वचितच ग्राहक बाजारात येत आहेत. त्यामुळे सकाळी ९ ते रात्री ९ हा कालावधी मोठा असल्याचीही चर्चा जनतेत आहे. तसेच आता मोकळीक मिळाल्याने बिनधास्तपणे वावरलो आणि रूग्ण संख्या वाढली किंवा संभाव्य तिसरी लाट आली तर पुन्हा लॉकडाऊन लागू केला जाऊ शकतो याचीही भिती सामान्य व्यापारी व नागरिकात व्यक्त केली जात आहे. यावर उपाय म्हणून दुकाने सुरू ठेवण्याचा वेळ मर्यादित करता येऊ शकतो का असा विचार होण्याची आवश्यकता आहे. रात्री ९ ऐवजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी दिली तर गर्दी रोखणे आणि कोरोनाची चेन ब्रेक करणे सोयीचे होईल अशीही चर्चा आहे. तसेच विनाकारण फिरणा-यांना आळा घालणेही शक्य होईल. शेजारच्या धुळे व नंदुरबार जिल्ह्यात सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.
प्रशासन संभ्रमात आहे का❓
अनलॉक झाल्यामुळे आता नियमांचे उल्लंघन करणा-यांवर कारवाई करावी का नाही या संभ्रमात प्रशासन आहे की काय ? अशी शंका घेण्यासारखी परिस्थिती दिसून येत आहे. सोशल डिस्टन्सींगचे पालन व सॅनिटायजरचा वापर हे शब्द विस्मरणात गेले आहेत. थोड्या फार प्रमाणात मास्कचा वापर होत आहे. दुकानांमध्ये गर्दी,भररस्त्यावर फेरीवाल्यांचे अतिक्रमण,वाहतुकीची कोंडी,कोविड नियमांचे होणारे उल्लंघन या बाबी चिंता वाढविणा-या ठरत आहेत.
कारवाईला 'लॉक'❓
नपाचे अतिक्रमण विरोधी पथक कुठे आहे ? आताही निर्बंध लागू आहेतच पण कारवाई का नाही ? हा प्रश्न निर्माण होत आहे. ही प्रशासनाची निष्क्रीयता आहे का संभ्रमावस्था हा देखील एक प्रश्नच आहे.
नियम आपल्या हितासाठी
जनतेनेही अनलॉक म्हणजे कोरोना गेला असे समजू नये. नागरिकांना सुविधा मिळावी यादृष्टीने प्रशासनाने अनलॉकची प्रक्रिया सुरू केली आहे. यातही नियमांचे पालन करायचेच आहे. आपल्या हितासाठी नियम आहेत ही जाणीव महत्वाची आहे. जनता जर अशीच बिनधास्तपणे वागत राहील तर तिसरी लाट रोखणे अशक्य आहे. हा 'अनलॉक' पुढच्या 'लॉकडाऊन'ची नांदी ठरू नये अशी अपेक्षा करणे गैर ठरू नये.
No comments
Post a Comment