साहेब,खान्देशातील पिडीत शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्यासाठी मी आलोय आमदार अनिल पाटील पोहोचले मुख्यमंत्र्यांच्या दरबारात

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे संपूर्ण तीन जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याची केली मागणी
------------------------------------------------------------------
              - * जाहीरात * -
----------------------------------------------------------------
अमळनेर - अमळनेर विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण खान्देशात यंदा वार्षिक सरासरीच्या २५% पेक्षा कमी प्रजन्यमान झाले असुन,श्रावणात देखील सगळीकडे कोरडच असल्याने पिकांची आशा जवळपास संपली आहे. अश्या कठीण परिस्थितीत शेतकरी राजाच्या वेदना पाहणे असह्य झाल्याने अमळनेर विधानसभा मतदार संघाचे आमदार अनिल पाटील यांनी तातडीने मुंबई गाठून मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी पोहोचले. यावेळी कोणत्याही परिस्थितीत खान्देशात दुष्काळ जाहीर करावा अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचेकडे केली आहे.
काय आहेत मागण्या
वर्षा या शासकीय निवासस्थानी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री ना.अजित दादा पवार या दोघांचीही भेट घेतली.साहेब केवळ माझा अमळनेर मतदारसंघच नव्हे तर संपुर्ण खान्देशातील जळगाव,धुळे व नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने दुष्काळामुळे पीडित झालेल्या माझ्या शेतकरी बांधवांच्या व्यथा मांडण्यासाठी मी याठिकाणी आलो असून माझा बळीराजा खूपच खचलाय.एकवेळा काय दुबार काय आणि तिबार काय असे पेरणीचे सारेच प्रयत्न फोल ठरले असून पिकांची आशा तर जवळपास संपलीच आहे, शेतकऱ्यांनी आता आशा सोडली आहे,आता पुढे काय? हा एकच प्रश्न प्रत्येकासमोर असून अश्या कठीण परिस्थितीत आपले महाविकास आघाडी सरकार आपल्या पाठीशी ठाम उभे राहिल ही आस साऱ्या शेतकरी बांधवाना आहे.तरी खान्देशातील शेतकऱ्यांचा एक प्रतिनिधी आणि शेतकरी पुत्र म्हणून मी आपणास विनंती करतो की पूर्णपणे खचलेल्या आमच्या बळीराजास हेक्टरी २५,०००/- रुपये सरसकट विनाअट सानुग्रह अनुदान जाहीर करा,शेतीपंपाचे चालू वर्षाचे विज बिल माफ करा,गावोगावी गुरांसाठी चारा छावण्या सुरू करा,याव्यतिरिक्त जे जे करण्याजोगे असेल ते ते करा पण बळीराजाला धीर द्या अश्या मागण्या अत्यंत भावनाशील स्वरात व लेखी निवेदनाद्वारे आमदारांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे केल्यात.याप्रसंगी राज्याचे गृहमंत्री ना.दिलीप वळसे-पाटील देखील उपस्थित होते.
दरम्यान दरवेळी अत्यंत धीटपणे आपल्या मतदारसंघात विकासकामांसाठी निधीचा आग्रह धरणारे आमदार पाटील यावेळी प्रथमच शेतकऱ्यांच्या व्यथा मांडताना अत्यंत भावनाशील झालेले दिसून आल्याने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी देखील त्यांचे संपुर्ण म्हणणे काळजीने ऐकून घेत घाबरू नका महाविकास आघाडी सरकार या भूमातेच्या सुपूत्रांचे असल्याने शेतकऱ्यांच्या मागे हे सरकार ठाम उभे राहणार असून यात खान्देशचा विशेष प्राधान्याने विचार होईल आणि पूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न होईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी आमदार पाटील यांना दिली.
३२खेड्यांचा मांडला प्रलंबित अतिवृष्टी अनुदानाचा प्रश्न
अमळनेर तालुक्यात सप्टेंबर २०१९ मध्ये अतिवृष्टीमुळे पीडित झालेले ३२ खेड्यातील शेतकरी अनुदानापासून अजूनही वंचित असल्याने आमदार अनिल पाटील यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे हा प्रश्न देखील काळजीपूर्वक मांडून त्वरित संबधित गावांना प्रलंबित अनुदान वितरित करावे अशी विनंती केली,यावर आमदारांना सकारात्मक आश्वासन देण्यात आले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.