प्रचंड मताधिक्याने विजय मिळवत अनिल दादांनी दुस-यांदा गाठली मुंबई

Sunday, November 24, 2024

/ by Amalner Headlines
राष्ट्रवादीचे मुख्य प्रतोद पदाचा मिळाला मान,मंत्रीपदाचाही पुन्हा मिळणार बहुमान

अमळनेर - यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार व विद्यमान मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी आपल्या कौशल्याने सूक्ष्म नियोजन करत मोठ्या मताधिक्याने पुन्हा विजयश्री मिळवत पुन्हा मुंबई गाठली आहे. ते पुन्हा विधानसभेत दिसणार नाही या शरदचंद्र पवारांच्या विधानाला त्यांनी खोटे ठरवत आपली मतदारसंघात असलेली पकड सिद्ध केली आहे. तर त्यांची पुन्हा विधीमंडळ पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी निवड करण्यात आली असून आगामी मंत्रीमंडळातही त्यांचा पुन्हा समावेश होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.
मतमोजणीची पार पडली प्रक्रीया
         निकाल जाहीर होताच कार्यकर्त्यांनी जल्लोषात मिरवणूक काढून मोठा विजयोत्सव साजरा केला. मंत्री अनिल भाईदास पाटील यांना १,०९,४४५ मते मिळाली. तर अपक्ष शिरीष चौधरी यांना ७,६०,१० मते मिळाल्याने अनिल पाटील ३३ हजाराच्या लीडने विजयी झाले आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अनिल शिंदे यांना १३,७९८ मते मिळाली.
          मतमोजणीच्या 
सुरुवातीला टपाली मतपत्रिका मोजल्या गेल्या.यात मंत्री अनिल पाटील यांनी आघाडी घेतली. त्यानंतर ईव्हीएम मशीन वरील मतमोजणीस प्रारंभ झाला. एकूण २४ फेऱ्यांमध्ये मोजणी करण्यात आली,सुरूवातीच्या फेरीपासुन अनिल पाटील मोठ्या
मताधिक्याने आघाडीवरच राहिले. अमळनेर शहरातील काही मतदान केंद्रांवर शिरीष चौधरीनी मताधिक्य घेतले मात्र अनिल पाटलांपेक्षा अधिक. मताधिक्य ते मिळवू शकले नाही.अखेरच्या फेरीपर्यंत अनिल पाटलांनी आघाडी कायम ठेवत विजय प्राप्त केला.निवडणूक निर्णय अधिकारी नितीन मुंडावरे यांनी विजयाची घोषणा केल्यानंतर मंत्री अनिल पाटील यांचे मतमोजणी कक्षात आगमन झाले. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे हस्ते अनिल पाटील यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबियांच्या उपस्थितीत प्रमाणपत्र स्वीकारले. यानंतर तेथूनच विजयी मिरवणुकीस सुरूवात झाली.
विजयाचा जल्लोष
         मिरवणूकीत हजारोच्या संख्येने महायुतीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते,अनिल पाटील व माजी जि.प.सदस्या सौ.जयश्री पाटील यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी हे रथावर विराजमान झाले होते.
ताडेपुरा,पैलाड व फरशी रोडवर जेसीबीच्या साहाय्याने फुले व गुलाल उधळून जल्लोषात स्वागत करण्यात आले.मिरवणुकीत डीजे, ढोल ताशे व लेझीम पथकाचा निनाद असल्याने कार्यकर्त्यानी जल्लोषात ठेका घेतला होता. गुलालाचा तर अक्षरशः सडा पडत होता,वाटेत अनेक ठिकाणी महिलांनी औक्षण केले तर व्यापारी बांधव आणि नागरिकांनी बुके देऊन स्वागत केले,मिरवणूक मंत्री अनिल पाटील यांच्या निवासस्थानी पोहोचल्यावर त्यांच्या मातोश्रीने औक्षण केले.येथेही कार्यकर्त्यानी प्रचंड जल्लोष केला.
मतदारांचे आभार - विरोधकांवर टीकास्त्र
अनिल पाटील यांनी याठिकाणी कार्यकर्त्यांशी संवाद साधतांना त्यांचे व संपूर्ण जनतेचे आभार मानले तसेच पराभूत उमेदवार शिरीष चौधरी व त्यांचे बंधू डॉ रविंद्र चौधरी यांच्यावर जोरदार निशाणा साधत बुच्चन वर अमळनेर विकत घेण्याची भाषा करणाऱ्यांना आम्हीच विकत घेतले असून ज्यांनी त्यांच्यासाठी विनाकारण आपल्यावर खालच्या पातळीवर टीकेची झोड उठवली त्यांना सोडणार नाहीच असा इशारा देखील त्यांनी दिला व विकासाचा रथ असाच अबाधित राहील अशी ग्वाही दिली.यानंतर उपस्थित मंडळींकडून त्यांच्यावर सत्काराचा वर्षाव झाला.
खा.स्मिताताई व कार्यकर्त्यांची मेहनत
       मंत्री अनिल पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत महायुती धर्म पाळत उमेदवार असलेल्या
खा.स्मिताताई वाघ यांच्यासाठी प्रचंड मेहनत घेतली होती,आता विधानसभा निवडणुकीत स्मिताताई वाघ यांनी देखील तेवढीच मेहनत अनिल पाटील यांच्या विजयासाठी घेतली. भाजपा कार्यकर्ते देखील अतिशय प्रामाणिकपणे कामाला लागले होते त्याचाही फायदा अनिल पाटील यांना नक्कीच या निवडणुकीत झाला आहे.
मंत्री पाटील यांनी शरद पवारांचे विधान ठरवले खोटे
       'ते यापुढे निवडून येणार नाहीत, याची काळजी आम्ही घेऊ' असे उद्गार शरद पवार यांनी मंत्री अनिल पाटील यांच्याविषयी काढले होते. मात्र खुद्द मोठ्या पवार साहेबांच्या विधानाला खोटे ठरवत मंत्री पाटील यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. माजी आमदार साहेबराव पाटील यांचेही सहकार्य महत्वाचे ठरले. तसेच सूक्ष्म नियोजन केल्याने मंत्री अनिल पाटील यांच्या गळ्यात पुन्हा विजयाची माळ पडली असून यामुळे हे नेतृत्व मातब्बर असल्याचे सिद्ध झाले आहे. विधीमंडळ पक्षाचे मुख्य प्रतोदपदी निवड करण्यात आली असून मंत्री मंडळातही निश्चितपणे संधी मिळेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines