शौचालयाचा वापर न करणारे सावधान...१५ डिसेंबर नंतर बसणार कारवाईचा बडगा गावकरीही बनू शकतात स्वच्छतादुत....मिळणार बक्षिसे

Sunday, December 8, 2019

/ by Amalner Headlines

अमळनेर -
स्वच्छ भारत अभियानांतर्गत शासकीय योजनेतून शौचालय बांधकामाची अंतिम मुदत दि.१५ डिसेंबर पर्यंत असून त्यानंतर ग्रामीण भागातील कोणताही ग्रामस्थ उघड्यावर शौचाला जावू शकणार नाही. असे करणे कायदेशीर गुन्हा ठरणार असल्याचे आवाहन पंचायत समिती अमळनेरच्या वतीने करण्यात आले आहे. यासाठी शासकीय पातळीवर विविध उपाय योजना राबविण्यात येत आहेत.  
     स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालयाचे बांधकाम करण्याची अंतिम मुदत दिनांक १५डिसेंबर २०१९ असून त्यानंतर कुणी उघड्यावर शौचाला जाताना आढळल्यास संबंधितांवर फौजदारी व दंडात्मक स्वरूपाची कारवाई करण्यात येईल याची सर्वांनी  गांभीर्याने नोंद घ्यावी.उघड्यावर शौचाला 
जाणा-यांवर प्रतिबंध करण्यासाठी अंमळनेर पंचायत समिती अंतर्गत 'बॅड माॅर्निंग पथक' स्थापन करण्यात येणार  असून या अभियानाचा भाग होऊ इच्छित असणा-या नागरिकांची नोंदणी स्वच्छतादूत म्हणून पंचायत समिती अंमळनेर येथे  करण्यात येणार आहे.तरी तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होऊन या ऐतिहासिक कामात हातभार लावावा असे पंचायत समिती अमळनेरच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.सर्व स्वच्छतादूत यांना पंचायत समिती मार्फत  ओळखपत्र देण्यात येणार आहे.१५ डिसेंबर नंतर उघड्यावर  शौचासाठीं जाणा-या व्यक्तीचा फोटो  काढून पंचायत समितीला पाठवल्यास संबंधित स्वच्छतादूतास  पंचायत समिती मार्फत ५०० रुपयांचे रोख बक्षीस पंचायत समिती तर्फे देण्यात येईल.ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत संबंधित व्यक्ती उघड्यावर शौचासाठी गेली आहे अशा ग्रामपंचायतीचे सरपंच,
उपसरपंच ,ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक यांनी  तात्काळ संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा आणि  रूपये १००० इतकी दंडाची रक्कम  पंचायत समिती  अंमळनेर येथे  जमा करावी.सदर कर्तव्यात कसूर केल्यास सरपंच,उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचेवर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३९ (१) अंतर्गत अपाञतेची  कारवाई करण्यात येईल.तसेच ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांचेवर महाराष्ट्र जिल्हा परिषद, जिल्हा सेवा (शिस्त अपिल) नियम१९६४ अंतर्गत शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल याची सर्वांनी  गांभीर्याने नोंद घ्यावी .सदर कामात कुणीहीअडथळा  आणण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांवर शासकीय कामकाजात अडथळा आणणे व शासकीय कर्मचारी यांना दमबाजी करणे प्रकरणी भारतीय दंड संहिता कलम ३५३अंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल.उघड्यावर शौचाला गेल्यावर १२००रूपये दंड आणि भारतीय दंड संहिता कलम २६९ अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरवणे व रोगराई पसरवणे प्रकरणी सहा महिने कारावासाची शिक्षा होउ शकते याची तालुक्यातील सर्व  लोटा बहाद्दरांनी गांभीर्याने नोंद घ्यावी असे आवाहन गटविकास अधिकारी पंचायत समिती अंमळनेर यांनी केले आहे.

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines