अमळनेर - अतिवृष्टीने नुकसान झालेल्या तालुक्यातील ५२ गावातील शेतकऱ्यांच्या प्रस्तावातील त्रुटी आठवडाभरात दूर करण्याचा निर्णय होणार असल्याची माहिती आमदार अनिल पाटील यांनी मुंबई येथून दिली आहे.
यापूर्वी दोन वेळा मदत व पुनर्वसन सचिव किशोर राजे निंबाळकर यांच्याशी याबाबत चर्चा झाली असून आताविभागीय आयुक्त राजाराम माने,आ.अनिल पाटील,तहसीलदार मिलिंद वाघ व विभागीय अधिकारी यांची बैठक झाली त्यात हा निर्णय झाला. मार्च महिन्यात झालेल्या अधिवेशनात आमदार अनिल पाटील यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता, व तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर वाचा फोडली होती. सतत नापिकी असलेल्या तालुक्यात गतवर्षी अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते.
फेरप्रस्ताव तयार होणार
अमळनेर तालुक्यातील ५२ गावांना सन २०१९ मध्येअतिवृष्टी झाली होती. त्यात ९ ऑगस्ट रोजी तालुक्यात मारवड मंडळात ८६ मिमी,पातोंडा १०१ मिमी, वावडे ७४ मिमी असा व १० सप्टेंबर रोजी मारवड १४० मिमी, अमळगाव ८० मिमी पाऊस पडला होता. या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील ५२ गावांच्या २३ हजार १९४ शेतक-यांच्या १९ हजार ४१३ हेक्टर शेतीतील शेतीपिके व फळपिकांचे नुकसान झाले होते यासंदर्भात पंचनामे करून जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांकडे पंचनाम्यांचा अहवाल सादर करण्यात आला होता.तेव्हा पासूनच आमदार अनिल पाटील याबाबत पाठपुरावा करत होते.
त्यानंतर याबाबत प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे दाखल झालेला होता. या प्रस्तावातील त्रुटी तहसीलदार यांच्यामार्फत दूर करून जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत आयुक्तांकडे जाणार आहे. त्यानंतर शासन स्तरावर याबाबत निर्णय होऊन यश मिळावे यासाठी आमदार अनिल पाटील प्रयत्न करत आहेत. लवकरच याबाबत निर्णय होणार असून आशादायी आश्वासन जेष्ठ नेत्यांनी आमदार पाटील यांना दिले आहे.
No comments
Post a Comment