युरिया खतांच्या कृत्रीम टंचाई विरोधात अमळनेरात माजी आ.स्मिता वाघांनी उठविला आवाज कृत्रीम टंचाई निर्माण करणाऱ्यां विरुद्ध कारवाई करा - तहसीलदार व जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडे मागणी

Thursday, July 23, 2020

/ by Amalner Headlines
-------------------------------------------------------------------------
         - * जाहीरात * -
-----------------------------------------------------------------------
अमळनेर -
कोरोना आजाराच्या लॉकडाऊनमुळे शेतकरी राजा आधीच भरडला असतांना ऐन पेरणीच्या काळात त्याची युरिया खतासाठी वणवण होऊन रांगा लावूनही त्याला खत मिळत नसल्याने व खतांची काळ्या बाजारात विक्री होत असल्याची ओरड होत असल्याने या गंभीर प्रश्नी माजी आमदार  स्मिता वाघ यांनी आवाज उठविला असून अमळनेर परिसरात युरिया खतांची कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
              यासंदर्भातअमळनेरचे तहसीलदार यांना दिलेल्या  निवेदनात म्हटले आहे की, शेतक-यांना ५ वर्षा नंतर पुन्हा एकदा कृत्रिम खत टंचाईला तोंड द्यावे लागत आहे.आज तालुक्यातील शेतकरी युरीया व इतर खतांसाठी फिरत आहेत.
कृत्रिम खत टंचाई हा आघाडी शासनाचा पायगुण असून कृषी विभाग साठेबाजांवर मेहरबान असल्याचे निदर्शनात आले आहे. वास्तवात २० दिवसांत युरिया व इतर आवश्यक खतांचा पुरवठा रेल्वेद्वारे तालुक्याला मिळाला आहे.परंतु तालुक्यात कृषी विभागामार्फत योग्य नियोजन न केल्यामुळे आज खतांची कृत्रिम टंचाई निर्माण होवून साठेबाज व कृषी विभागाच्या मेहरबानीमुळे वाढीव भावात खत विक्री होत आहे.तसेच गरज नसलेले वाढीव दरातील खते घेण्याचे बंधन शेतक-यांना देण्यात येत आहे.यातून शेतकरी वर्गाची आर्थिक पिळवणूक केली जात आहे.गेल्या ५ वर्षात भाजपा शासनाच्या कार्यकाळात एकदाही  खतांची टंचाई निर्माण झाली नव्हती तसेच वाजवी दरात खत उपलब्ध होत होते.परंतु ह्या वर्षी कृषी विभागाच्या मेहरबानीमुळे साठेबाज यांचे चांगलेच फावले असून हंगामात शेतकरी खतांसाठी दारोदारी भटकत आहे.तालुक्यातील खतांची मागणी व पुरवठा याचे गणित बिघडले असून आघाडी शासनाच्या पायगुणामुळे खतांच्या कृत्रिम टंचाईला सामोरे जावे लागत असल्याचे ही निदर्शनात आले आहे. 
            विशेष म्हणजे तालुक्यात कोरोना साथ रोगाच्या रुग्णाची संख्या ६०० च्या वर गेली असून खते वेळेवर उपलब्ध नसल्यामुळे कृषी केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी होत असून यातून कोरोना रुग्ण संख्या वाढण्याची शक्यता आहे. हंगामात शेतक-यांना  वाजवी दरात खत उपलब्ध करणे ही शासनाची जबाबदारी असून तालुक्यातील शेतक-यांना  वाजवी दरात खते उपलब्ध होण्याबाबत आपल्या स्तरावर तातडीने कार्यवाही करण्यात यावीअशी मागणी मा.आ.स्मिता वाघ यांनी केली आहे.
साठेबाजांवर आजपासून सुरू होणार धाडसत्र
          तहसीलदार यांना निवेदन दिल्यानंतर स्मिता वाघ यांनी असंख्य शेतकऱ्यांसमक्ष जिल्हा कृषी अधिकारी शिंदे यांचेशी मोबाईल वर संपर्क साधून युरिया कृत्रीम टंचाईची कारणे विचारली.
यावेळी तालुका कृषी अधिकारी वारे व अमळनेर पंचायतसमितीचे कृषी अधिकारी अमोल भदाणे देखील उपस्थित असल्याने त्यांचेही जिल्हा कृषी अधिकाऱ्यांशी बोलणे करून दिले. जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी श्रीमती वाघ यांची मागणी लक्षात घेता आजपासून खतांचे साठे, व जादा दराने विक्री करणाऱ्या  विरुद्ध धाड सत्र सुरू करण्याचे आदेश तालुका कृषी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
बंद असलेली मका खरेदीही सुरू करण्याची केली मागणी
        अमळनेर येथील शासकीय मका व ज्वारी (भरड धान्य) खरेदी केंद्रात बंद असलेली मका खरेदी तात्काळ सुरु करण्याची मागणी देखील माजी आ. स्मिता वाघ यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली.निवेदनात म्हटले आहे की अमळनेर येथील शासकीय मका व ज्वारी (भरड धान्य) खरेदी केंद्रात मका खरेदी गोदाम उपलब्ध नसल्याच्या कारणास्तव बंद असल्याचे निदर्शनात आले आहे.सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात तालुक्यातील नोंदणी केलेल्या शेतक-यांचा मका खरेदी अभावी शिल्लक असून मका उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक अडचण निर्माण झाली आहे.तरी सदर खरेदी केंद्रात बंद असलेली मका खरेदी तात्काळ सुरु करण्याबाबत कार्यवाही तातडीने करण्यात यावी अशी विनंती श्रीमती स्मिता वाघ यांनी केली आहे.
            सदर निवेदन देतांना प्रांताधिकाऱ्यांच्या वतीने तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांनी स्वीकारले,यावेळी प.स. चे उपसभापती भिकेश पाटील,शहराध्यक्ष उमेश वाल्हे,शिवसेना तालुका प्रमुख विजय पाटील,भाजपा तालुका सरचिटणीस जिजाब पाटील,राकेश पाटील,संजय पाटील,नाटेश्वर पाटील,सदा बापू,मच्छिंद्र पाटील,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शिवाजी राजपूत,आयज बागवान उपस्थित होते.
---------------------------------------------------------------------

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines