-------------------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------
अमळनेर - राज्याच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे आयुक्त यांनी दि.१९ जुलै रोजी दिलेल्या आदेशानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कोरोनाचे कामातून सुट मिळावी. अशी मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना संघटनेचे कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांनी आज दिले. सदर निवेदनात म्हटले आहे की,जिल्ह्यातील ग्रामीण,नागरी व आदिवासी विभागात अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मार्च २०२० पासून कोरोनाचे सर्व्हेक्षण करण्याचे काम देण्यात आले आहे. सदर कामामुळे अंगणवाडी केंद्राच्या मुळ कामावर परिणाम होत असून नियमित कामकाज करण्यात अडचणी येत आहेत. अंगणवाडी केंद्राच्या ० ते ९ वर्षे वयाचे लाभार्थी, गरोदर व स्तनदा माता यांचे उंची व वजन घेऊन ग्रोथ मॉनिटरींगचे काम रोजच करावे लागते.
अंगणवाडी कर्मचारी ह्या अत्यंत संवेदनशील घटकांसाठी काम करतात. त्यांना कोरोनाचे विविध कामे दिल्यामुळे ते स्वत: पॉझिटिव्ह होण्याची शक्यता आहे. आणि त्या पॉझिटिव्ह झाल्यास ० ते ६ वर्ष वयाचे बालके, गरोदर माता व स्तनदा माता या संवेदनक्षम असल्याने यांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
म्हणून मा.आयुक्त, एबाविसेयो, नवी मुंबई यांच्या आदेशानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या कामातून सुटमिळावी.
अशा आशयाची मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेऊन त्यांना आज देण्यात आले.
यावर जिल्हाधिकारी यांनी मा.आयुक्त यांचे पत्र मिळाल्याचे नमूद करत अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी प्राधान्याने मुळ काम करावे तसेच मुळ कामावर परिणाम होणार नाही याची दखल घेतली जाईल.याबाबत आयुक्त, एकात्मिक बालविकास सेवा योजना यांच्याबरोबर आजच व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे बैठक होणार आहे. सदर बैठकीत सविस्तर चर्चा करून त्याप्रमाणे क्षेत्रिय अधिकाऱ्यांना सुचना देण्यात येतील.असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे असे रामकृष्ण बी. पाटील यांनी कळविले आहे.
No comments
Post a Comment