सुदृढ आरोग्यासाठी स्वच्छता महत्वाची - पालकमंत्री गुलाबराव पाटील स्वच्छ पाण्यासाठी एकही गाव वंचित राहणार नसल्याची दिली ग्वाही

Friday, November 20, 2020

/ by Amalner Headlines
-------------------------------------------------------------------------
               - * जाहीरात * -
----------------------------------------------------------------------
जळगाव - 
स्वच्छता हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक असून सुदृढ आरोग्यासाठी देखील स्वच्छता आवश्यक असल्याने आपल्या परिसरातील शाश्‍वत स्वच्छता टिकवून ठेवण्यासाठी शौचालयांचा वापर करण्याचे आवाहन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. जागतिक स्वच्छता दिनानिमित्त जिल्हा परिषदेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील होते.
          जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधत जिल्हा परिषद आवारात स्वच्छतेबाबत विनोद ढगे व सहकार्‍यांनी पथनाट्य सादर करून स्वच्छता,आरोग्य बाबत जनजागृती केली. तर स्वच्छतेबाबत पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी उपस्थितांना शपथ दिली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत गाडगेबाबा, माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पालकमंत्री गुलाबराव पाटील व व मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केला.
२३ हजार कोटींची योजना पूर्ण करणार
             या प्रसंगी ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, राज्यातील एकही गाव स्वच्छ पाण्यापासून वंचित राहू नये यासाठी राज्य सरकारने योजना आखली आहे. पाण्यासोबतच एकही गाव स्वच्छतागृहाविना राहू नये हा देखील सरकारचा प्रयत्न असून पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातर्फे २०२३ पर्यंत तब्बल २३ हजार कोटींची योजना पूर्ण करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. ते पुढे म्हणाले की, जिल्ह्याचा पालकमंत्री पदासोबतच पाणीपुरवठा व स्वच्छता विभागासारखे मोठे खाते जिल्ह्याला मिळाले आहे. त्याचा फायदा जिल्ह्यासाठी करून घ्यायचा आहे, पाण्याचा आणि स्वच्छतेचा विषय निघाला तर जळगाव जिल्ह्याचे नाव राज्यभर घेतले जाईल असे कार्य करायचे आहे असेही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. जिल्ह्यात साडेपाच लाख व्यक्तिगत स्वच्छतागृहे आहेत, आणखी त्यात वाढ होणार होणार असल्याचेही गुलाबराव पाटील यांनी म्हटले.
दिव्यांगांसाठी स्वच्छतागृह; राज्यात पहिला प्रयोग
           ना. पाटील पुढे म्हणाले की, दिव्यांगांसाठी जिल्ह्यात स्वच्छतागृहे बांधण्यात येणार आहे. राज्यातील हा पहिलाच प्रयोग आहे. या स्वच्छतागृह बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला आहे. दिव्यांग कल्याण योजनेंतर्गत हे काम होणार आहे. जलशक्ती मंत्रालयामार्फत राबविण्यात येणार्‍या योजनेत देशात जिल्ह्याचा तिसरा तर राज्यात पहिल्या क्रमांकाचे पुरस्कार मिळाले आहे. याबद्दल पालकमंत्र्यांनी जि.प.अध्यक्षांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान केला.
जिल्ह्यात मशाल यात्रा
                    स्वच्छतेचा संदेश जिल्ह्याभरात देण्यासाठी दि. १९ ते २७ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यात स्वच्छता मशाल यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. पालकमंत्र्यांच्या हस्ते मशाल यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. जिल्ह्यातील गावागावात जाऊन मशाल यात्रा स्वच्छतेचा संदेश देणार आहे.

          या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा ना. रंजनाताई पाटील,उपाध्यक्ष लालचंद पाटील,समाजकल्याण  सभापती जयपाल बोडडे,आरोग्य सभापती रविंद्र पाटील, माजी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन ,जि.प. सदस्य नाना महाजन,अमित देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील,अति.मु.का.
अधिकारी गणेश चौधरी, ग्रा. प.  चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बोटे ,जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे यांनी स्वच्छतेचे महत्व विशद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद ढगे यांनी केले तर आभार दिगंबर लोखंडे यांनी मानले.
==========================================

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines