सर्व व्यापारी वर्गासाठी एकच नियम असावा,दुजाभाव नको - व्यापा-यांची अपेक्षा
सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत दुकाने सुरू
अमळनेर शहरात दररोज सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंतच सर्व दुकाने सुरू ठेवण्यात यावेत असा आदेश देण्यात आला आहे. तर या नियमात भाजीपाला,दुध विक्रेते,किराणा दुकाने यांना सवलत देण्यात आली आहे. या दुकानांसह खाद्यपदार्थांची दुकाने,परमिट रूम,बार या दुकानांनाही रात्री ९ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. या दुकानात सोशल डिस्टन्सींगचे पालन करणे व क्षमतेपेक्षा ५० टक्के एवढीच उपस्थिती बंधनकारक करण्यात आली आहे. तर पार्सल सुविधा देणा-या हॉटेल्सचे किचन रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील असे आदेशात म्हटले आहे.
या निर्णयाने व्यापारी वर्गात नापसंती
पण जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानाप्रमाणे किराणा दुकाने,खाद्यपदार्थांची दुकाने,परमिट रूम व बार ही दुकाने रात्री ९ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे या निर्णयाबाबत अन्य व्यावसायिक व दुकानदारांमध्ये नापसंती असल्याचीही चर्चा व्यापारी बांधवात असल्याचे समजते. इतर दुकाने सुरू ठेवली तर कोरोना वाढतो आणि किराणा दुकाने,हॉटेल्स सुरू ठेवली तर कोरोना वाढत नाही का ? असा सवालही व्यापारी वर्गात उपस्थित होत आहे. प्रशासनाने व्यापारी वर्गासाठी एकच नियम लागू करावा. वेगळे नियम लागू करून दुजाभाव करू नये अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
रात्री नाईट कर्फ्यु
शहरात दररोज रात्री १० ते सकाळी ५ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यु पाळण्यात यावा असे आदेश प्रशासनाने दिले आहेत. या नाईट कर्फ्युचे नागरिकांनी पालन करावे. आवश्यकता असल्याशिवाय कुणीही घराबाहेर पडू नये. वैद्यकीय अधिकारी - कर्मचारी, रात्रीच्या वेळी नोकरीसाठी जाणारे व येणारे,बाहेर गावाहून येणारे प्रवासी यांना या नियमात सूट देण्यात आली आहे. तर विनाकारण रस्त्यावर फिरतांना आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.
याच प्रमाणे कोविड - १९ च्या दृष्टीने आवश्यक ते विविध निर्देश देण्यात आले असून त्या नियमांचे नागरिकांनी पालन करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
No comments
Post a Comment