अमळनेर - शहर व तालुक्यातील विज ग्राहकांना येत असलेल्या अडचणी सोडविण्यासाठी अमळनेर येथील विज वितरण कंपनीच्या कार्यालयात स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात यावा अशी मागणी येथील अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री प्रशांत ठाकरे (महावितरण कंपनी अमळनेर उपविभाग -१) यांचेकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
या निवेदनात म्हटले आहे की, कोविड-१९ च्या महामारीमुळे लॉकडाऊन मार्च २०२० मध्ये जाहीर केल्यानंतर त्या काळातील बिलांचे वाचन अथवा रीडिंग झालेले नाही. ह्या काळातील विज बिलाबाबत अजूनही मोठ्या प्रमाणात आमच्याकडे तक्रारी प्राप्त होत आहे. वीज ग्राहकांना मोठ्या रकमेची बिले येणे, सरासरी बिल येणे याबाबतची समाधान कारक उत्तरे अथवा निवारण संबंधितांकडून करण्यात येत नसल्याने नागरिक मोठ्या प्रमाणावर त्रस्त आहेत. वीज मंडळाच्या कार्यालयात त्यांना इकडून तिकडे फे-यार माराव्या लागत आहेत. यामुळे ग्राहकांचा बहुमूल्य वेळ सुद्धा वाया जात आहे. याबाबतची दखल आपण घ्यावी व आपण ग्राहक मार्गदर्शन कक्ष लवकरात लवकर सुरू करून ग्राहकांच्या बिलांबाबतच्या तक्रारींचे निवारण त्वरित करावे. यावेळी चर्चा करतांना कार्यकारी अभियंता श्री प्रशांत ठाकरे यांनी सांगितले की, आपण ग्राहकांचे हिताच्या दृष्टीने त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करीत आहोत व करणार आहोत. तसेच ग्राहक ऑनलाइन किंवा टोल फ्री नंबरवर सुद्धा आपली तक्रार नोंदवू शकतात असेही त्यांनी सुचविले. यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेरचे अध्यक्ष श्री मकसुद बोहरी, उपाध्यक्ष अॅड. भारती अग्रवाल, सेक्रेटरी विजय शुक्ल, ऊर्जा मित्र सुनील वाघ आदी उपस्थित होते.
No comments
Post a Comment