Popular Posts

अतिक्रमित टपरीधारकाची नपाच्या अतिक्रमण विभाग प्रमुखाला मारहाण

No comments

पोलीसात गुन्हा दाखल,कठोर कारवाईची अपेक्षा

अमळनेर - येथील नगर परिषदेचे अतिक्रमण विभाग प्रमुख श्री राधेश्याम अग्रवाल हे शहरातील कोंबडी बाजार भागात कर्तव्यावर असतांना त्यांना दोघांनी मिळून मारहाण केल्याची घटना काल दिनांक १८ डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली. रस्त्यालगत अतिक्रमित जागेवर टपरी ठेवण्याच्या मुद्दयावरून ही घटना घडली आहे. याबाबत पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल करण्यात आली आहे. तर आपल्या कर्मचा-याबाबत घडलेल्या घटनेत त्यांच्या पाठीशी उभे रहाण्याची ठोस भुमिका मुख्याधिकारी यांनी घेतली नसल्याची चर्चा होत आहे.
काय आहे घटना
      शहरातील कोंबडी बाजार भागात रस्त्याचे सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी अतिक्रमण विभागाचे प्रमुख श्री राधेश्याम अग्रवाल हे कामावर हजर होते. त्याठिकाणी जितेंद्र रंजन साळुंखे व दशरथ रंजन साळुंखे हे दोघे भाऊ आले. त्यांनी आपली अतिक्रमणात असलेली टपरी तुटू देऊ नका असे श्री अग्रवाल यांना सांगितले. याविषयी मी निर्णय देऊ शकत नाही. आपण मुख्याधिकारी यांना भेटा असे सांगितल्याचा राग आल्याने जितेंद्र व दशरथ साळुंखे यांनी श्री राधेश्याम अग्रवाल यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण व शिवीगाळ केली व जिवे मारण्याची धमकी दिली. सदर घटनेची अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल करण्यात आली आहे. शासकीय कर्मचा-यास कामावर असतांना मारहाण,शिवीगाळ करणे गंभीर गुन्हा आहे. याप्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईची मागणी श्री राधेश्याम अग्रवाल यांनी केली आहे.
मुख्याधिकारी यांच्या भुमिकेवर प्रश्नचिन्ह ?
          आपल्या कर्मचा-याबाबत काही अनुचित प्रकार घडल्यास  वरिष्ठांनी त्याच्या पाठीशी उभे रहाणे अपेक्षित असते. पण कालच्या घटनेत नपाचे मुख्याधिकारी श्री तुषार नेरकर यांनी तशी भुमिका घेतली नाही अशी चर्चा होत आहे. याउलट प्रकरण वाढवू नका मिटवून घ्या असे सांगितले असल्याची माहिती समोर येत आहे. अशी भुमिका घेण्यामागील कारण काय असा प्रश्न निर्माण होत असून पोलीसांनी याबाबत कठोर कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
-------------------------------------

जेवढे जास्त मताधिक्य तेवढे चांगले खाते मिळणार

No comments
गिरीश महाजन यांच्या वक्तव्याची अमळनेरकरांना आहे आठवण

   *अमळनेर* - यंदाच्या निवडणुकीत अमळनेर येथे महायुतीचा मेळावा झाला असता त्यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी अनिल पाटील यांना जेवढे जास्त मताधिक्य मिळेल तेवढे चांगले खाते मिळू शकते असे भाकीत केले होते, अमळनेरच्या जनतेने आता त्यांना ३३ हजारांचे मोठे मताधिक्य दिल्याने,मंत्री महाजन यांच्या वक्तव्याची आठवण अमळनेरकराना असून महायुती सरकार आता त्यांना कोणते खाते देणार?अशी चर्चा होत आहे.दरम्यान राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील हे उत्तर महाराष्ट्रात एकमेव आमदार असल्याने त्यांना पुन्हा मंत्रिपद नक्कीच मिळेल अशी शक्यता वर्तविली जात आहे.

प्रचंड मताधिक्याने विजय मिळवत अनिल दादांनी दुस-यांदा गाठली मुंबई

No comments
राष्ट्रवादीचे मुख्य प्रतोद पदाचा मिळाला मान,मंत्रीपदाचाही पुन्हा मिळणार बहुमान

अमळनेर - यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार व विद्यमान मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी आपल्या कौशल्याने सूक्ष्म नियोजन करत मोठ्या मताधिक्याने पुन्हा विजयश्री मिळवत पुन्हा मुंबई गाठली आहे. ते पुन्हा विधानसभेत दिसणार नाही या शरदचंद्र पवारांच्या विधानाला त्यांनी खोटे ठरवत आपली मतदारसंघात असलेली पकड सिद्ध केली आहे. तर त्यांची पुन्हा विधीमंडळ पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी निवड करण्यात आली असून आगामी मंत्रीमंडळातही त्यांचा पुन्हा समावेश होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.
मतमोजणीची पार पडली प्रक्रीया
         निकाल जाहीर होताच कार्यकर्त्यांनी जल्लोषात मिरवणूक काढून मोठा विजयोत्सव साजरा केला. मंत्री अनिल भाईदास पाटील यांना १,०९,४४५ मते मिळाली. तर अपक्ष शिरीष चौधरी यांना ७,६०,१० मते मिळाल्याने अनिल पाटील ३३ हजाराच्या लीडने विजयी झाले आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अनिल शिंदे यांना १३,७९८ मते मिळाली.
          मतमोजणीच्या 
सुरुवातीला टपाली मतपत्रिका मोजल्या गेल्या.यात मंत्री अनिल पाटील यांनी आघाडी घेतली. त्यानंतर ईव्हीएम मशीन वरील मतमोजणीस प्रारंभ झाला. एकूण २४ फेऱ्यांमध्ये मोजणी करण्यात आली,सुरूवातीच्या फेरीपासुन अनिल पाटील मोठ्या
मताधिक्याने आघाडीवरच राहिले. अमळनेर शहरातील काही मतदान केंद्रांवर शिरीष चौधरीनी मताधिक्य घेतले मात्र अनिल पाटलांपेक्षा अधिक. मताधिक्य ते मिळवू शकले नाही.अखेरच्या फेरीपर्यंत अनिल पाटलांनी आघाडी कायम ठेवत विजय प्राप्त केला.निवडणूक निर्णय अधिकारी नितीन मुंडावरे यांनी विजयाची घोषणा केल्यानंतर मंत्री अनिल पाटील यांचे मतमोजणी कक्षात आगमन झाले. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे हस्ते अनिल पाटील यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबियांच्या उपस्थितीत प्रमाणपत्र स्वीकारले. यानंतर तेथूनच विजयी मिरवणुकीस सुरूवात झाली.
विजयाचा जल्लोष
         मिरवणूकीत हजारोच्या संख्येने महायुतीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते,अनिल पाटील व माजी जि.प.सदस्या सौ.जयश्री पाटील यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी हे रथावर विराजमान झाले होते.
ताडेपुरा,पैलाड व फरशी रोडवर जेसीबीच्या साहाय्याने फुले व गुलाल उधळून जल्लोषात स्वागत करण्यात आले.मिरवणुकीत डीजे, ढोल ताशे व लेझीम पथकाचा निनाद असल्याने कार्यकर्त्यानी जल्लोषात ठेका घेतला होता. गुलालाचा तर अक्षरशः सडा पडत होता,वाटेत अनेक ठिकाणी महिलांनी औक्षण केले तर व्यापारी बांधव आणि नागरिकांनी बुके देऊन स्वागत केले,मिरवणूक मंत्री अनिल पाटील यांच्या निवासस्थानी पोहोचल्यावर त्यांच्या मातोश्रीने औक्षण केले.येथेही कार्यकर्त्यानी प्रचंड जल्लोष केला.
मतदारांचे आभार - विरोधकांवर टीकास्त्र
अनिल पाटील यांनी याठिकाणी कार्यकर्त्यांशी संवाद साधतांना त्यांचे व संपूर्ण जनतेचे आभार मानले तसेच पराभूत उमेदवार शिरीष चौधरी व त्यांचे बंधू डॉ रविंद्र चौधरी यांच्यावर जोरदार निशाणा साधत बुच्चन वर अमळनेर विकत घेण्याची भाषा करणाऱ्यांना आम्हीच विकत घेतले असून ज्यांनी त्यांच्यासाठी विनाकारण आपल्यावर खालच्या पातळीवर टीकेची झोड उठवली त्यांना सोडणार नाहीच असा इशारा देखील त्यांनी दिला व विकासाचा रथ असाच अबाधित राहील अशी ग्वाही दिली.यानंतर उपस्थित मंडळींकडून त्यांच्यावर सत्काराचा वर्षाव झाला.
खा.स्मिताताई व कार्यकर्त्यांची मेहनत
       मंत्री अनिल पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत महायुती धर्म पाळत उमेदवार असलेल्या
खा.स्मिताताई वाघ यांच्यासाठी प्रचंड मेहनत घेतली होती,आता विधानसभा निवडणुकीत स्मिताताई वाघ यांनी देखील तेवढीच मेहनत अनिल पाटील यांच्या विजयासाठी घेतली. भाजपा कार्यकर्ते देखील अतिशय प्रामाणिकपणे कामाला लागले होते त्याचाही फायदा अनिल पाटील यांना नक्कीच या निवडणुकीत झाला आहे.
मंत्री पाटील यांनी शरद पवारांचे विधान ठरवले खोटे
       'ते यापुढे निवडून येणार नाहीत, याची काळजी आम्ही घेऊ' असे उद्गार शरद पवार यांनी मंत्री अनिल पाटील यांच्याविषयी काढले होते. मात्र खुद्द मोठ्या पवार साहेबांच्या विधानाला खोटे ठरवत मंत्री पाटील यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. माजी आमदार साहेबराव पाटील यांचेही सहकार्य महत्वाचे ठरले. तसेच सूक्ष्म नियोजन केल्याने मंत्री अनिल पाटील यांच्या गळ्यात पुन्हा विजयाची माळ पडली असून यामुळे हे नेतृत्व मातब्बर असल्याचे सिद्ध झाले आहे. विधीमंडळ पक्षाचे मुख्य प्रतोदपदी निवड करण्यात आली असून मंत्री मंडळातही निश्चितपणे संधी मिळेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

विधानसभा निवडणुकीची उद्या मतमोजणी

No comments
"किसकी होंगी हार,किसकी होंगी जीत"- मतदारांत चर्चेला उधाण


अमळनेर - अत्यंत चुरशीच्या वातावरणात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या दिनांक २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. अमळनेर विधानसभा मतदार संघातील निवडणूक तिरंगी झाली असली तरी खरा सामना महायुतीचे उमेदवार व विद्यमान मंत्री अनिल पाटील व अपक्ष उमेदवार माजी आमदार शिरीष चौधरी यांच्यात आहे. उद्याच्या मतमोजणीत विजयाचे पारडे कुणाकडे झुकते याकडे तालुक्यासह सर्व राज्याचे लक्ष लागले आहे. उमेदवार व समर्थकांनी आपल्या विजयाचे दावे - प्रतिदावे केले आहेत. तर किसकी होंगी हार और किसकी होंगी जीत याबाबत मतदारांत जोरदार चर्चा रंगल्या आहेत.
मतमोजणीचे नियोजन
        उद्या दिनांक २३ नोव्हेंबर रोजी सकाळी येथील वखार महामंडळाच्या गोडावूनमध्ये मतमोजणीला सुरूवात होणार आहे. प्रशासकीय यंत्रणेने मतमोजणीची संपूर्ण तयारी केली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी व उपविभागीय अधिकारी नितीन मुंडावरे यांच्या नेतृत्वाखाली मतमोजणीचे नियोजन करण्यात आले आहे.
सर्वाधिक चर्चेतील निवडणुक
यंदाची विधानसभा निवडणुक सर्वाधिक चर्चेत राहीली आहे. महायुती व महाविकास आघाडी यांच्यासह अन्य पक्ष व दिग्गज अपक्ष यांच्यामुळे निवडणुक प्रचारात खुपच रंगत निर्माण झाली होती. त्यामुळे निकाल काय लागेल हे सांगणे कठीण झाले आहे. तर विकासाचे पर्व अखंड सुरू रहाणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
विजयाचे दावे - प्रतिदावे

        अमळनेर विधानसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार व विद्यमान आमदार अनिल भाईदास पाटील यांनी केलेली विकास कामे,शासनाच्या विविध योजना,महायुतीच्याची फौज,प्रचाराचे योग्य नियोजन व मतदारांचे मिळालेले समर्थन या जोरावर विजयाचा दावा केला आहे. तर माजी आमदार शिरीष चौधरी यांनीही आपल्या कार्यकाळात केलेली विकास कामे,आमदारांच्या विरोधात असलेला रोष व आगामी विकासाचे या बळावर जनतेचा आशिर्वाद आपल्यालाच मिळेल असा दावा केला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.अनिल शिंदे यांनीही आपण विजयी होणार असल्याचे सांगितले आहे. उमेदवारांचे समर्थक आपलाच नेता विजयी होणार,गुलाल आमचाच,आमदार आमचाच असा दावा करत आहेत,तर मतदारही कोण विजयी होणार याबाबत चर्चा करत आहेत.  
काही तासांची प्रतिक्षा

            मतमोजणीला काहीच तास शिल्लक आहेत. विजयाचे दावे - प्रतिदावे,विजयाची गॅरंटी यांच्या चर्चांना उधाण आले असले तरी विजयाची माळ कोणत्या "दादा"च्या गळ्यात पडणार यासाठी काही तासांची प्रतिक्षा करावी लागणार आहे.
----------------------------

होय,मंत्री महोदय अनिल पाटील तुमचं चुकलेच....तरीही आम्ही तुमच्या पाठीशी !

No comments
प्रा.सुरेश पाटील यांनी मांडली भुमिका

*अमळनेर* :  मंत्री अनिल दादा पाटील,आज तुम्ही अमळनेर शहरात आणि तालुक्यात जी विकासाची गंगा आणली आहे त्यापेक्षा तुम्ही तालुक्यातील जनतेच्या व्यथा समजून घ्यायला पाहिजे होत्या.ज्यांनी तुम्हाला  २०१९ मध्ये निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली त्यांच्यासाठी तरी किमान,मुंबईच्या फेऱ्या मारण्यापेक्षा गावोगावी जाऊन त्यांच्या सुखदुःखात सहभागी व्हायला पाहिजे होते, भले शहराचा,तालुक्याचा विकास झाला नसता तरी चाललं असते, अमळनेर शहर आणि तालुका विकासाच्या बाबतीत आणखी ५ वर्ष मागे गेला असता,याशिवाय आणखी दुसरं काय झालं असत, दादा तुमचं चुकलंच, तुम्ही अमळनेर शहराला प्रगतीची वाट दाखवली. त्यामुळे प्रशासकीय इमारत,पंचायत समिती,बस स्थानक, ७०कोटींचा बायपास रस्ता,कॉलनी भागातील शेकडो रस्ते ही मोठी कामे होऊ शकली,ती झाली नसती तरी काय बिघडले असते. आज धरणाचे प्रस्तंभ जमिनीपासून वर आले आहेत,धरणाच्या सुप्रमा आणि बांधकामासाठी निधी मिळावा यासाठी तुम्ही दिल्ली,मुंबई वाऱ्या केल्या त्यापेक्षा दादा तुम्ही ४२ खेड्यांकडे लक्ष द्यायला पाहीजे होते. धरणाला पांढरा हत्ती संबोधणाऱ्यांपैकी तुम्ही नाहीत हेच मोठं दुर्भाग्य,धरणासाठी झटण्यापेक्षा मतदार संघातील  गावातील आपल्या कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन त्यांची विचारपूस केली असती तर बरं झालं असत, हेच धरण म्हणजे आता तुम्हाला मरण यातना देणार आहे नाही का? अमळनेर तालुक्यातील भावी पिढी, सुखी व्हावी,आपला कार्यकर्ता सक्षम व्हावा यासाठी धरण बंधारे बांधण्यापेक्षा कार्यकर्त्यांच्या वैयक्तिक भेटी घेणे महत्वाचे होते दादासाहेब,दादा तुम्ही ते केलं नाही, त्यामुळे तुमचं चुकलेच. दादा मूळचे भाजपचे कार्यकर्ते.
पडत्या काळात तुम्ही भाजप सांभाळली आहे,मात्र दोन वेळा पडल्या नंतर तुम्ही २०१९ मध्ये पक्षांतर केले.स्वर्गीय उदय वाघ, कृषिभूषण साहेबराव पाटील आणि संपूर्ण मतदार संघाला तत्कालीन आमदारांच्या अवैध धंद्यामुळे अमळनेर शहर आणि तालुक्यातील अख्खी तरुणाई व्यसनाधीन होते की काय? अशी भीती वाटू लागली होती. गल्ली बोळात आडोशात चालणारे जुगार,सट्टा,मटका यांचे क्लब त्या काळात खुलेआम मुख्य रस्त्यांवर, बाजारपेठेत दिसू लागले होते,शहरातील मुख्य चौकात अनेक नवखे गुंडांच्या झुंडीच्या झुंडी दिसुन येत,आपल्या आया बहिणींच्या अंगावर त्यांची नजर सतत फिरायची, त्या टवळखोरांची शेरेबाजी ऐकून,महिला मुलींना खाली मान टाकून मुकाट्याने  हतबल होऊन पुढे मार्गस्थ व्हावं लागायचं,ते थांबलं पाहिजे, अशी भावना प्रत्येक अमळनेरकरांच्या मनात २०१९ मध्ये होती. प्रत्येक गावात अन शहरात गुंडगिरी असते.मात्र त्या गुंडगिरीला राजसत्तेचे पाठबळ मिळाले तर ती फोफावत जाते,नेमके तेच २०१४ते २०१९ या काळात झालं, गुंडगिरी, सट्टा मटका,बोगस दारू यातच तरूणाई बुडाली,शेकडो घरातील तरुणांचा जीव गेला, हे पुन्हा व्हायला नको म्हणून २०१९ मध्ये भूमिपुत्र जन्माला आला आणि शहरात क्रांती झाली अन वरील सर्व गोष्टींना आळा बसला. दादा तुम्ही तुमच्या कार्यकाळात गुंडांना आसरा दिला नाही, हे तुमचं  चुकलंच, तुम्ही गुंडांना पोसायला पाहिजे होते, त्यांच्या साठी किंवा अवैध धंदे करणाऱ्या मुजोर तरुणासाठी पोलीस स्टेशनला फोन करून दबाव आणायला पाहिजे होता.
जेणेकरून अवैध धंद्यातील मिळालेला बक्कळ पैशाच्या जोरावर या गुंडांनी गावात व्यापारी, महिला मुली, किंवा दुर्बलांचे शोषण केले असते तुम्ही तेच तर होऊ दिले नाही,आणि याचं मोल आम्हाला नाही,
म्हणून दादा आपले चुकलेच.
राज्यात सत्तांतर झाले आणि आमदाराचे तुम्ही मंत्री झाले, अमळनेरात काही लोकं याला गद्दारी म्हणतात, ती तुम्ही करायलाच नको होती,सत्तेत गेल्यामुळे आपल्या गावांच्या,
शहराच्या विकासासाठी जो करोडो रुपयांचा भरघोस निधी मिळाला त्यापेक्षा फक्त वार्षिक ५  कोटीच्या आमदार निधीवरच तुम्ही समाधान मानले असते तर बरं झालं असतं. त्या ५ कोटींवर अमळनेर मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलवण्याची भाषा कोणी  केली असती तर त्याला आज जे टीका करतात त्यांनीच उत्तर दिलं असतं,किंवा मी विरोधी पक्षात आहे,निधीच मिळाला नाही,अशी बोळवण करता आली असती,  असे सांगता आले असते,पीक विमा किंवा शेतकऱ्यांना नुकसानीची आज जी भरपाई मिळाली आहे,हजारो शेतकऱ्यांना उत्पन्नापेक्षा अधिक नुकसान भरपाई मिळाली आहे,ती केवळ सत्तेत गेल्यामुळे, मंत्रीपदामुळे,मात्र आम्ही हे सर्व विसरलो आहोत,यापेक्षा तुम्ही 
 सत्तेत गेले नसते तर आमचं करोडो रुपयांचे नुकसान झाले असते, ते आम्ही सोसले असते कारण आम्ही मनाने श्रीमंत आहोत, आणि या श्रीमंती पुढे आम्हाला पीक विमा, अवकाळी नुकसान भरपाई,करोडो चा विकास निधी तुटपुंजा वाटतो. असो,आज ज्यांना पीक विमा मिळाला नाही ते आज तुमच्यावर आगपाखड करत आहेत.
त्यांचेही योग्यच आहे,कारण आपत्ती व्यवस्थापन खात्याचे मंत्री असूनही चाळीसगावला मदत मिळते आणि अमळनेरला मिळत नाही,दुष्काळ जाहिर होत नाही, हे योग्य नाही. जे शेतकरी ज्यांना पीक विमा मिळाला नाही, नुकसान भरपाई मिळाली नाही ते १२० किलोमीटरवरून येणाऱ्या माजी आमदारांच्या मागे आज उभे आहेत,जनतेने त्यांना संधी दिली तर कदाचित  शेतकऱ्यांना भावी काळात पीक विमा मिळेल, पण त्याबदल्यात अमळनेरकरांना अनेक गोष्टींची किमंत मोजावी लागणार, हे विशेष.
        अहो,स्वातंत्रोत्तर पहिल्यांदा तुमच्या रूपाने अमलनेरला लाल दिवा मिळाला, म्हणून आम्ही इतका विकास पाहू शकलो, मंत्री असण्याचा आणि आमदार असण्याचा काय फरक असतो,ते आम्ही सुद्धा पहिल्यांदा अनुभवले,म्हणून पश्चिम महाराष्ट्राचा इतका झालेला विकास कशा मुळे आहे ? हे सुद्धा समजले,यंदा तुम्ही निवडून आलात तर तुम्ही पुन्हा मंत्री होणार अन तुम्ही पाहिलेले धरणाचे स्वप्न पूर्ण होणार,उर्वरीत खेड्यांचा विकास होणार,रस्ते होणार,पण हे आता शक्य नाही, कारण आम्हाला विकास नकोय,आम्हाला फक्त आमच्या वैयक्तिक कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होणारा आमदार,हवा आहे,नमस्कार करणारा, गोड बोल्या.... अन ....टिम्ब टिम्ब असो.. दादा तुमचे काही अवैध धंदा नाही. जसे १२० किलोमीटर वरून येणाऱ्या उद्योगपती माजी आमदाराला विस्कळीत झालेल्या अवैध धंद्याची सेटिंग लावायची आहे,त्यांच्या अवैध धंदेवाईक मित्रांना पुनः सेट करायचे आहे आणि म्हणून ते महाशय सध्या भूलथापा देऊन गोरगरीब जनतेची माथी भडकावून मतांचे राजकारण करत आहे, ते यशस्वी झाल्यास किंमत मोजावी लागेल ती प्रत्येक अमळनेरकराला. म्हणून अजून ही वेळ गेलेली नाही, मित्रहो उठा,जागे व्हा,जो करतो तोच चुकतो,जो पडल्या नंतर जबाबदारी झटकून पळून जातो,तो कधीच आपला नसतो,तो जरी आपला असल्याचे आपल्याला दाखवतो तरी त्यात त्याचा स्वार्थ असतो....मी हे सर्व जाणतो म्हणून मी अनिल दादांच्या पाठीशी आहे,तुम्हाला हे पटलं तर तुम्ही ही अनिल दादाला साथ द्या...अन्यथा पुढे येणाऱ्या संकटापासून तुम्हाला कोणीही वाचू शकत नाही कारण अमलनेरचे भुसावळ व्हायला वेळ लागणार नाही 

आपला
प्रा.सुरेश पाटील
कार्याध्यक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अमळनेर 
माजी सरपंच- एकरुखी ता अमळनेर

मातीतल्या माणसासाठी राजपूत समाजही एकवटला, अनिल पाटलांना विजयी करण्याचा निर्धार

No comments
खासदार स्मिताताई वाघ यांचा समाजातर्फे नागरी सत्कार

*अमळनेर* : महायुतीचे उमेदवार अनिल भाईदास पाटील यांना मातीतला भूमिपुत्र म्हणुन पाठबळ देण्यासाठी अनेक जण संघटितपणे पुढे येत असतांना अमळनेर तालुका व मतदार संघातील राजपुत समाजाने देखील अमळनेर येथे एकत्रित येत अनिल पाटलांनाच विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला.
         राजपूत समाजाने आयोजित केलेल्या या मेळाव्यात जळगाव लोकसभा मतदार संघाच्या प्रथम महिला खासदार स्मिताताई वाघ यांचा समाजाच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी मंत्री अनिल पाटील यांनाही विशेष आमंत्रित करण्यात आले होते. सर्व प्रथम छत्रपती शिवराय आणि हिंदू सूर्य वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले.यावेळी खा.स्मिताताई वाघ मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की राजपुत समाजाने नेहमीच हिंदुत्व म्हणून भाजपाला साथ दिली असून लोकसभा निवडणुकीत देखील प्रत्येक गावातुन मला भरभरून साथ देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट केले आहेत.आताही आपले महायुतीचे उमेदवार अनिल पाटील असल्याने समाजाने अनिल पाटील यांनाच साथ द्यावी, त्यांनी मतदारसंघात उल्लेखनीय विकास खरोखरच करून दाखविला असून विशेष म्हणजे धरणासाठी यशस्वी पाठपुरावा केल्याने गती मिळाली आहे,लवकरच हे धरण केंद्राच्या योजनेत समाविष्ठ होऊन पूर्णत्वानतंर शेतकरी राजा सक्षम होण्याचे दिवस दूर नाहीत, अनिल दादांनी खूप केलं आणि पुढेही करायचे असल्याने त्यांच्यावर विश्वास ठेवा,आपल्या मातीतल्या सुपुत्रालाच निवडून द्या, शेवटी आपल्या लोकांची काळजी आपणच घेऊ, सर्व सोबत येत असल्याने २३ चा निकाल आपल्याच पारड्यात पडेल असा विश्वास व्यक्त करत हा समाज महायुती सोबतच राहावा यासाठी राणाजींनी जसा एक एक माणूस जोडला तसाच आताही जोडा असे आवाहन त्यांनी शेवटी केले.
      मंत्री अनिल पाटील बोलतांना म्हणाले की मराठा व राजपुत समाज दोन्ही क्षत्रिय असल्याने लढणे आणि जिंकणे ही शिकवण आपल्याला पूर्वजांनी दिली आहे,राजकारण आणि समाजकारण करतांना आम्ही जात किंवा धर्म पहिला नाही,जातीच राजकारण करत समाजाला बदनाम करण्याचं काम २०१४ पासून या मतदारसंघात सुरू झालं आणि २०१४ च्या निवडणूकीमध्ये हा मतदारसंघ बदनाम झाला,मात्र मागील २०१९ च्या निवडणूकीत चूक सुधारल्याने बदल झाला आणि मंत्रिपद आपल्या मतदारसंघाला मिळालं आणि आताही मंत्र्यालाच मतदान करण्याची संधी आपल्याला असुन,सर्व मिळून महायुतीचे सरकार आपल्याला आणायचे आहे, मी गेल्या पाच वर्षात विकास कामे देतांना कोणत्या गावावर अन्याय केला नाही,खऱ्या अर्थाने विकासाचे पर्व आज सुरू झाले आहे, मातीतल्या माणसाला मी कधी कुणाला फसवले नाही, नोकरी लावून देतो म्हणून पैसे गोळा केले नाही, अनेक गरजू आणि गोरगरिबांना मदतही देत असतो, मातीतला असल्यास धावुन जातो, आपल्याला शेतकरी बांधवांच्या कल्याणासाठी धरण पूर्ण करायचे असेल आणि पुढच्या पिढ्या सुखी पहायच्या असतील तर मतदान करतांना नक्कीच विचार करावा आणि आपण एकाच मातीत जन्मलो असल्याने मातीसाठी खूप काही करू अशी ग्वाही त्यांनी दिली.
      यावेळी मंचावर राष्ट्रवादीचे जिल्हा प्रवक्ते योगेश देसले,माजी जि.प.सदस्य संदीप पाटील तसेच लोटनसिंग राजपुत, भरतसिंग पाटील, मच्छीन्द्रसिंग पाटील, पुनमचंद पाटील, प्रविण सिंग पाटील, प्रकाश भीमसिंग पाटील,अरुण पाटील, अमोल राजपूत, चंदुसिंग परदेशी,महेंद्र राजपूत, रामकृष्ण पाटील,गोविंदसिंग भिलालीकर,महेंद्र राजपुत, प्रकाश राजपुत, गुलाबसींग पाटील, प्रदीपसिंग राजपूत, विजयसिंग राजपुत, प्रविण पाटील यासह मान्यवर उपस्थित होते.
       सदर मेळाव्यात कळमसरे, भोरटेक, दोधवत, कळंबु, जैतपिर, भिलाली, झाडी, शहापूर, तांदळी 
खेडी,आटाळे,खडके,दरेंगाव
हिंगोने,कुर्हे खु.॥, कुर्हे बुद्रुक, रामेश्वर, राजवड, खोकरपाट, जुनोने, खेडीढोक, लोणे, वंजारी, बोदर्डे यासह अमळनेर शहरातील शेकडो राजपुत समाज बांधव उपस्थित होते. सूत्रसंचालन ऍड.दीपेनसिंग परमार यांनी केले.

महायुती पदाधिकाऱ्यांचा माजी आमदार शिरीष चौधरींवर पलटवार

No comments
सर्व आरोप फेटाळले,अनिल दादांनी शाश्वत विकास केल्याचा दावा

*अमळनेर* : मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी अमळनेर मतदार संघात केलेला शाश्वत विकास जनतेला दिसत असून विरोधकांना तो दिसणार नाही,मतदार संघात यावेळी जातीभेद नसून विकासावर जनता खुश आहे, आणि विकासावरच प्रेम करणारे लोक असल्याने अनिलदादा मोठ्या फरकाने यंदाही विजयी होतील असा दावा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भागवत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.
      दोन दिवसांपूर्वी माजी आमदार शिरीष चौधरी यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध आरोप अनिल पाटील यांच्यावर केले असल्याने सदर आरोपांना उत्तर देण्यासाठी महायुतीच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली.यावेळी भाजप तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील,शहराध्यक्ष विजय राजपूत, सेनेचे तालुकाप्रमुख प्रथमेश पवार,शहर प्रमुख संजय पाटील,राष्ट्रवादी शहराध्यक्ष मुक्तार खाटीक उपस्थित होते.
        यावेळी विविध आरोपांचे खंडन करताना भागवत पाटील 
म्हणाले की,माजी आमदार अनिल दादांना माजी म्हणत आहेत पण २६ नोव्हेंबर २०२४ पर्यंत आमदार व मंत्री पदावर ते कायम आहेत.धरणाच्या ४८०० कोटीच्या सुप्रमाला ते साधी म्हणतात पण ती साधी नाही,१५ वर्षांतर सुप्रमा मिळाली असून शिरीष चौधरींनी देखील एक सुप्रमा आणली हा त्यांचा दावा खोटा आहे,उलट याच धरणाला माजी आमदार पांढरा हत्ती म्हणायचे.१९९८ पासून निम्न प्रकल्प सुरू होऊन आज २६ वर्ष झाली. आपण सर्वांचा कार्यकाळ पहिला,मात्र पाच वर्षात साडेचारशे कोटी अनिल दादांनी आणले असून आज धरणाचे झालेले काम दृश्य स्वरूपात दिसते.विकासाच्या बाबतीत बोलायचे झाले तर प्रत्येक गावात ग्रा.पं.आणि तलाठी कार्यालय बांधकाम, इतर मूलभूत सुविधांची कामे,रस्ते,शेतकरी बांधवांसाठी ५० गावात शेत जोड रस्ते दिले आहेत.आणि ठोस काम सांगायचे झाल्यास शहरात उभी राहत असलेली प्रशासकीय इमारत,सर्व कार्यालय येथे येणार असल्याने सामान्य माणसाचे हेलपाटे थांबणार आहेत.पं.स.इमारत बांधकामही सुरू झाले आहे.बस स्टँड कामासाठी १० कोटी रूपये मिळाल्याने नवीन होणार आहे.शहरात नवीन रस्ते,डीपी रोड, दगडी दरवाजा, मंगळ मंदिरासाठी २५ कोटी मंजूर केले आहेत.मदत व पुनर्वसन विभागाच्या माध्यमातून काय केले यावर आमचे उत्तर आहे की तालुक्यातील कोणत्याही शेतकरी बांधबांचे बँक स्टेटमेंट बघा कोणाच्या खात्यावर किती पैसे आलेत ते दिसेल,तब्बल साडे सहाशे कोटी आमच्या शेतकरी राजाला  गारपीट,पीकविमा,अवकाळी पाऊस या माध्यमातून मिळाले आहेत.मतदारसंघात लहान मोठे बंधारे बांधून सिंचन क्षमता वाढवली गेली आहे,मुडी, मांडळ व फाफोरे येथे ब्रिटिश कालीन फळ बंधाऱ्याचा प्रश्न मार्गी लावला आहे.त्यामुळे विकसाच्या बाबतीत तरी विरोधकांनी बोलूच नये असे सांगत गुंडगिरीचे समर्थक कोण हे जनतेला माहीत असुन माजी आमदारांचा गुन्हेगारासोबत असलेले सेल्फी चे चित्र त्यांनी पत्रकार परिषदेत सादर केले.आणि निवडणुका कायदा व सुव्यवस्था राखून खेळीमेळीच्या वातावरणातच होतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
भाजपातून ते निलंबीतच
    माजी आमदार शिरीष चौधरी यांना भाजपने पक्षातून
 निष्कासित केले असल्याचे पत्र त्यांनी यावेळी सादर करत त्यांचा पक्षाशी काहीही संबंध राहिला नसल्याचा खुलासा भागवत पाटील यांनी केला.श्री चौधरी हे पत्र बनावट असल्याचे सांगत असल्याचे पत्रकारांनी म्हटले असता भाजपाचे तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील यांनी या पत्राबाबत आम्ही पक्ष श्रेष्ठींकडे खुलासा केला असता त्यांनी पत्र अधिकृत असल्याचा दुजोरा दिला असून याठिकाणी जे जे पक्ष विरोधी कारवायांमध्ये सहभागी असतील त्यांच्यावर देखील कारवाई होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines